BJP Aggressive: जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत बोलू देणार नाही; राहुल गांधींबद्दल भाजप आक्रमक
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस खासदार राहुल गांधी जोपर्यंत त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत नाहीत, तोपर्यंत त्यांना सभागृहात बोलू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना घेरण्यासाठी आखण्यात आलेल्या खास व्युह रचनेतूनच सभागृहात सत्ताधारी आक्रमक दिसून येत आहेत.
राहुल यांनी लंडनमध्ये भारतीय लोकशाहीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या हाती आयते कोलीत सापडले असून, विरोधकांच्या ‘जेपीसी’च्या मागणीतून हवा काढण्यासाठी ‘जशास तसे उत्तर’ देण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचे आतापर्यंतच्या गदारोळावरून दिसून येत आहे.
संसदेच्या पहिल्या दिवसापासून राहुल यांनी माफी मागण्याच्या मागणीवर भाजप अडून आहे. तर, विरोधक अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्याच्या जुन्याच मागणीवर कायम आहेत. यामुळे सभागृहाच्या कामकाजाची कोंडी झाली आहे. शुक्रवारी (दि.१७) राहुल सभागृहात बोलतील अशी शक्यता होती. पंरतु, आठवड्याच्या शेवटी सत्ताधारी-विरोधकांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
सभागृहाच्या कारवाईचे थेट प्रक्षेपणादरम्यान आवाज बंद करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.सभागृहात विरोधी पक्षांच्या नेत्यांचे माईक ‘म्यूट’ करण्यात आल्याचे राहुल म्हणाले. आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी राहुल संसदेत दिसून आले. सभागृहात त्यांच्यावर जे आरोप लावले आहेत त्यांचे उत्तर देण्यास तयार आहे.पंरतु, भाजप अगोदर माफीची मागणीवर अडून बसले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा:
- Rahul Gandhi at Cambridge : माझ्यावर पेगाससद्वारे पाळत; भारतात लोकशाही धोक्यात : राहुल गांधी
- JPNadda Vs Rahul: राहुल गांधी देशविरोधी ‘टूलकिट’; जे.पी.नड्डा यांचा काँग्रेसवर निशाणा
- Budget session of Parliament: राहुल गांधींच्या संसदेतील ‘उपस्थिती’ वर भाजपचे बोट