नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान | पुढारी

नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा
ऐन होळीच्या सणासुदीच्या दिवशीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाडला प्रचंड तडाखा बसलेला असून द्राक्ष, गहू, कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

हवामान तज्ज्ञांकडून रविवार, दि. 5 मार्चपासून बुधवार, दि. 8 मार्च पर्यंत संपूर्ण परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. हा अंदाज चुकावा अशी प्रत्येक जण प्रार्थना करीत होता. मात्र सोमवार, दि. 6 च्या पहाटे दोन वाजेपासूनच निफाड परिसरात प्रचंड मेघ गर्जना व विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे चार तासापर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतच राहिला. जोरदार वारा आणि तुफानी पाऊस यामुळे अनेक ठिकाणी कापणीला आलेल्या गव्हाचे पीक पूर्णत: झोपले आहे.

निफाड www.pudhari.news
द्राक्ष नुकसान, निफाड

हजारो शेतकऱ्यांचे विक्रीला आलेले द्राक्षाचे पीक देखील संकटात सापडले असून बागायतदारांची वर्षभराची मेहनत एका तडाख्यात नष्ट होण्याची वेळ आली आहे. कडक उन्हामुळे उन्हाचा चटका बसून द्राक्षांची गुणवत्ता ढासळू नये यासाठी द्राक्ष घडांना खूप मोठा खर्च करून कागदाचे आवरण चढवावे लागते. लावलेला कागद पावसाच्या चार थेंबांमध्येच खराब होऊन जातो. त्यामुळे इतका प्रचंड खर्च करून लावलेले वेस्टन आणि त्यासाठी केलेले श्रम तर वाया जाणार आहेतच शिवाय या द्राक्ष घड्यांना आता बुरशी जीवाणूजन्य रोग आणि इतर गोष्टींचा सामना करावा लागून प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.

निफाड www.pudhari.news

हेही वाचा:

Back to top button