Eknath Shinde : पूल दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्थेमार्फत होणार चौकशी | पुढारी

Eknath Shinde : पूल दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्थेमार्फत होणार चौकशी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केली.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून केला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर यांना जोडणाऱ्या आणि सध्या बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा गर्डर अचानक एका बाजूला कलंडल्याने १४ कामगार जखमी झाले. सुदैवाने या दुघटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

ही दुर्घटना दुर्दैवी असून या दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे शिंदे यांनी  स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही  पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी तयार होत असलेल्या नवीन पुलांचे मूल्यमापनही त्रयस्थ मूल्यमापन संस्थेकडून करण्याचे निर्देश शिंदे (Eknath shinde) यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले.

या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या १३ कामगारांना उपचार करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. एका कामगारावर उपचार सुरू आहेत. शिंदे यांनी व्ही. एन. देसाई  रुग्णालयात जाऊन या कामगाराची विचारपूस केली. यावेळी एमएमआरडीए आयुक्त व्ही. श्रीनिवास राव उपस्थित होते.

पहा व्हिडीओ : भाऊरंगारी कट्टा – राजकीय नेत्यांशी दिलखुलास गप्पा

Back to top button