चाकरमान्यांनी मुंबई-गोवा महामार्ग फुलला, वाहतूक कोंडी | पुढारी

चाकरमान्यांनी मुंबई-गोवा महामार्ग फुलला, वाहतूक कोंडी

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमानी संकटांचा सामना करत कोकणात दाखल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग वरील खड्डे,कोरोनाची संकट आणि अतिवृष्टी या समस्यांचा सामना करीत चाकरमानी मोठ्या संख्येने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग फुलल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

कोरोनामुळे चाकरमानी गेल्यावर्षी गावी आले नव्हते. ती कसूर या वर्षी भरून काढण्यात येत असून यावर्षी जादा रेल्वे गाड्या, मोदी ट्रेन, २५०० एसटी बस बुक झाल्या आहेत. शिवाय पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. असे असताना महामार्गावर खासगी वाहनांच्या मोठ्या रांगा पहायला मिळत असून रस्त्यावर पडलेल्या खड्यातून गणेश भक्त मार्ग काढत आहेत.

राज्यात पावसाचा जोर कायम

राज्यात पावसाचा जोर कायम असून गुरूवारपर्यंत हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणेसह कोकण व मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश यांच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

यामुळे या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास पश्चिम आणि वायव्य दिशेकडे होत आहे.

त्यामुळे त्याचा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्याटप्प्याने प्रभाव जाणवेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.

दापोलीत रात्रभर पावसाचं थैमान!

दापोलीत (Ratnagiri Rain) रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून शहरातील विविध ठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं आहे.
दापोलीतील केळकर नाका, शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात सुमारे पाच फुटाने पावसाचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलेले आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात एनडीआरएफचे २५ जवान आणि ४ बोटीसह पथक दाखल झालेले आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button