पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर शहापूर (जि. ठाणे) तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे.
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेने दु:ख झाले आहे. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन अपघाताच्या ठिकाणी काम करत असून बाधितांना योग्य ती मदत मिळावी यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपये दिले जातील, असेही यामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आज पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री शिंदे पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हेही वाचा :