

इस्लामाबाद : काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान सरकार व सैन्यपुरस्कृत ‘लष्कर-ए-तोयबा’ या अतिरेकी संघटनेचा हात असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याने काश्मीर खोर्यात १० हजार दहशतवादी पाठवले होते, अशी धक्कादायक कबुलीच ‘तोयबा’चा दहशतवादी नसीर मदनी याने दिली आहे.
पाकमधील दहशतवादीच खुल्या मंचावरून देशाच्या कृत्यांची पोलखोल करत असून, मदनीच्या या कबुलीने पाकिस्तानचे सरकार व सैन्य दहशतवादाचा वापर राष्ट्रीय धोरण म्हणून करते, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी (दि. १४) बहावलनगर येथे मंचावरून भाषण करताना मदनीने तोयबाच्या दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केल्याचे सांगितले. ताेयबाचा प्रमुख हाफिज सईदने काश्मिरात १० हजार दहशतवादी पाठवले होते, अशी उघड कबुलीही दिली.
समोर आलेल्या व्हिडीओत नसीर मदनी लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईदवर कौतुकाचा वर्षाव करत त्याच्या गुन्ह्यांचे वर्णन करताना दिसत आहे. ‘अहो ऐका, याच हाफिज सईदने त्याग केला आहे. आज तो तुरुंगात आहे. तो पाकिस्तानचा असा पहिला कैदी असेल, ज्याच्याविरुद्ध साक्ष देणारा कोणीही नव्हता. तरीही त्याला शिक्षा झाली ती फक्त यासाठी की, त्याने काश्मीरसाठी, देशाच्या त्यागासाठी १० हजार मुले दिली. परंतु त्याला शिक्षा देऊन बनारसी ठगांनी तुरुंगात टाकून ठेवले आहे आणि तो आजही शांत आहे’, असे मदनी मंचावरून बोलत असल्याचे व्हिडीओत ऐकू येते.