

PM Modi Xi Jinping Meet
सात वर्षांनंतर चीन दौर्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.३१ ऑगस्ट) राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली. यावेळी मोदींशी बोलताना जिनपिंग म्हणाले, “चीन आणि भारत या दोन प्राचीन संस्कृती आहेत. आपण दोघंही जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहोत. आपण ‘ग्लोबल साउथ’चेही महत्त्वाचे सदस्य आहोत. आपल्याला आपल्या लोकांच्या भल्यासाठी आवश्यक सुधारणांमध्ये पुढाकार घ्यायचा आहे आणि मानव समाजाच्या प्रगतीस चालना देण्याची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडायची आहे."
चीनमध्ये झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रतिनिधी स्तरावरील चर्चेच्या प्रारंभी, चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रविवारी म्हटले की भारत आणि चीनने एकमेकांचे मित्र आणि चांगले शेजारी होणे अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंद झाला. गेल्या वर्षी काझानमध्ये आपली फार उपयोगी चर्चा झाली होती. दोन्ही देशांनी सीमारेषेवरून सैनिकांची माघार घेतल्यानंतर शांतता आणि स्थैर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमा विषयावर विशेष प्रतिनिधींनी एक करार केला आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे आणि दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवाही पुन्हा सुरू झाल्या आहेत."
चीन आणि भारत या दोन्ही प्राचीन संस्कृती आहेत आणि त्या पूर्वेकडील आहेत. आपण दोघेही जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहोत, तसेच ग्लोबल साउथमधील महत्त्वाचे सदस्यही आहोत. दोन देशांच्या जनतेच्या कल्याणात सुधारणा करणे, विकसनशील देशांच्या ऐक्य आणि पुनरुज्जीवनाला चालना देणे, आणि मानवी समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे. आपले संबंध शेजारधर्माचे, स्नेहाचे असावेत, आपण एकमेकांच्या यशात भागीदार असावं आणि 'ड्रॅगन' व 'हत्ती' एकत्र यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि चीनमधील सहकार्यामुळे २.८ अब्ज लोकांना फायदा होऊ शकतो. हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग खुला करेल. त्यांनी परस्पर विश्वास आणि सन्मान यावर आधारित संबंध अधिक दृढ करण्याची वचनबद्धताही व्यक्त केली.
मोदी शनिवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या जपान दौर्यानंतर चीनमध्ये पोहोचले. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत-चीन संबंध तणावग्रस्त झाले होते. या दौऱ्याचे एक उद्दिष्ट म्हणजे दोन्ही देशांदरम्यानच्या सीमा वादांना कमी करणे हे देखील आहे.