

Pakistan PM Shehbaz Sharif on Pahalgam attack
दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारताला जागतिक पाठिंबा मिळत असताना, पाकिस्तानवर दबाव वाढत आहे. शनिवारी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याच्या "तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह" चौकशीसाठी पाकिस्तान तयार असल्याचे म्हटले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये पासिंग-आउट परेडला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारतासोबत वाढत्या तणावावर आपले मौन सोडले. ते म्हणाले की, "पाकिस्तान काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तटस्थ आणि पारदर्शक चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे. शांततेला आमची पसंती आहे. आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही," असे ते म्हणाले.
पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. लष्करी सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाममधील हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना सलग दुसऱ्या रात्रीही गोळीबार सुरूच राहिला. गुरुवारी रात्रीही पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता आणि भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, प्रत्युत्तरादाखल, भारताने अटारी येथील एकात्मिक तपासणी नाके (आयसीपी) बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा सूट योजना (एसव्हीईएस) स्थगित करणे, त्यांना त्यांच्या देशात परतण्यासाठी ४० तासांचा कालावधी देणे, यासारखे अनेक राजनैतिक उपाय जाहीर केले आहेत. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने १९६० मध्ये स्वाक्षरी केलेला सिंधू जल करार देखील स्थगित केला आहे.
दरम्यान, अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांनी फूस दिल्यामुळे पाकिस्तानमध्ये गेल्या ३० वर्षांपासून दहशतवाद्यांना प्रशिक्षण (ट्रेनिंग) दिले जात आहे, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी शुक्रवारी दिली आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानचे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या स्काय न्यूजने ख्वाजा यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ही कबुली दिली.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्यसैनिक' म्हटले आहे. पहलगाम हल्ल्याप्रकरणी भारत पुन्हा पाकिस्तानवर खोटे आरोप करत आहे. या परिस्थितीमुळे त्यांनी बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील त्यांच्या नियोजित भेटी रद्द केल्या असून, भारताच्या वाढत्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानही तत्सम पावले उचलेल, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.