

Operation Sindoor Pakistan Rebuilding terror camps
नवी दिल्ली : भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मे महिन्यात पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर (PoK) येथील अनेक दहशतवादी तळ भारताच्या हवाईदलाने उद्ध्वस्त केले. तथापि, आता पाकिस्तान पुन्हा हे तळ उभारण्याच्या हालचाली करत आहे, अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे.
गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील LoC लगतच्या दाट जंगलात लहान पण अत्याधुनिक दहशतवादी तळ तयार करत आहे.
हे तळ उड्डाण भासमान, उपग्रह आणि थर्मल निरीक्षणापासून लपवता येतील, अशा प्रकारे बनवले जात आहेत. एनडीटीव्हीसह राष्ट्रीय स्तरावरील इतर इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेले लुनी, पुतवाल, टिपू पोस्ट, जमील पोस्ट, उमरनवाली, छपरार फॉरवर्ड, छोटा चक, जंगलोरा इ. ठिकाणी तळ पुन्हा बांधले जात आहेत.
त्याचबरोबर केल, सरदी, दूधनियाल, अथमुकाम, जुरा, लिपा, पचिबान, कहुटा, कोटली, खुइरत्ता, मंधार, निकाील, चमनकोट, जानकोटे येथे नवीन तळ उभे केले जात आहेत.
ही सर्व ठिकाणे दुर्गम भूप्रदेश आणि घनदाट वनराईने वेढलेली आहेत. जे भारताच्या ड्रोन आणि उपग्रह निरीक्षणापासून संरक्षण करतात.
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ने मोठ्या प्रशिक्षण केंद्रांऐवजी 200 हून कमी दहशतवाद्यांना सामावून घेणाऱ्या लहान तळांची योजना आखली आहे. प्रत्येक मिनी-कॅम्पमध्ये स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा असेल, थर्मल सेन्सर, लो-फ्रिक्वेन्सी रडार, ड्रोन-काउंटर उपकरणांनी सज्ज असणार आहे.
गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, बहावलपूर येथे अलीकडेच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि TRF चे वरिष्ठ नेते सहभागी होते. ISI च्या अधिकाऱ्यांनीही त्यात भाग घेतला.
जैशचा प्रमुख मसूद अझहर याचा गड असलेल्या बहावलपूरमध्ये ‘शहीद’ या नावाने पोस्टर्स आणि बॅनर्स लावले होते. एका व्हिडिओत दिसते की, हत्यारधारी, मास्क घातलेले लोक एका शोकसभेला सुरक्षा देत आहेत.
सूत्रांच्या मते, पाकिस्तानला जागतिक नाणे निधी, जागतिक बँक आणि आशियाई डेव्हलपमेंट बँकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा काही हिस्सा या दहशतवादी तळांच्या पुनर्बांधणीसाठी वळवला गेला आहे.
एप्रिल 22 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली होती. हे ऑपरेशन अत्यंत अचूक आणि मर्यादित वेळेत पार पाडण्यात आले.
ISRO च्या 10 उपग्रहांमार्फत लक्ष्यांची माहिती गोळा करून भारतीय हवाई दलाचे ड्रोन, लूटिंग म्युनिशन्स, दीर्घ पल्ल्याचे मार्गदर्शित क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली यांचा वापर एअरस्ट्राईकवेळी करण्यात आला.
Maxar Technologies च्या उपग्रह चित्रांनुसार, बहावलपूरमधील मरकझ सुभान अल्ला आणि मुरिदकेमधील मरकझ तैयबा यांसारख्या 9 प्रमुख दहशतवादी ठिकाणांचे संपूर्ण विनाश झाला.