

इस्लामाबाद; पीटीआय : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पीएमएल (एन) पक्षाने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील आंदोलकांविषयी रविवारी नरमाईची भूमिका घेतली. आंदोलकांविषयी यू टर्न घेताना येथील ९९ टक्के निदर्शक हे देशभक्त लोक आहेत, असे पक्षाने म्हटले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी आज मतदान होत असून हिंसाचाराच्या शक्यतेने बंदोबस्त वाढवला आहे.
आमच्या पक्षाचे प्रतिनिधी लवकरच बंदी घातलेल्या आणि या प्रदेशातील आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या ‘जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी’च्या (जेएएसी) सदस्यांची भेट घेतील, असे पंतप्रधान शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्ला यांनी सांगितले. त्यामुळे पीओकेमध्ये गेल्या काही महिन्यांतील हिंसक घटनांनंतर या प्रदेशातील आंदोलकांबाबत शरीफ यांचा पक्ष बचावात्मक भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वीपर्यंत पीएमएल (एन) ने सरकारची आंदोलकांवरील कारवाई न्याय्य ठरवण्यासाठी, बंदी घातलेल्या ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी गटाचे सदस्य आंदोलकांत असल्याचा दावा केला होता. पीओकेमधील निवडणुकांचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सोमवारी पार पडत आहे.
आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या दोन टप्प्यांमध्ये, पीएमएल(एन) पक्षाने २५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पीओकेमधील विधानसभेच्या एकूण ४५ निर्वाचित जागांच्या बहुमताचा आकडा पार केला आहे. आज चार जागांसाठी मतदान होणार आहे. सात मतदारसंघांमधील निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
जेएएसीशी संबंधित असलेल्यांपैकी ९९ टक्के लोक आपले देशभक्त बांधव आहेत. जेव्हा दोन तृतीयांश बहुमताने पीएमएल(एन)चे सरकार स्थापन होईल, तेव्हा आम्ही जेएएसीच्या प्रतिनिधींशी चर्चा करू. येथील प्रश्न सोडवण्याला आमचे प्राधान्य असेल
राणा सनाउल्ला, शाहबाज शरीफ यांचे सल्लागार