Pakistan Army chief Asim Munir : गिरे तो भी टांग ऊपर! पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला पराभवाचे 'बक्षीस', वाचा काय घडलं?
Pakistan Army chief Gen Asim Munir promoted to Field Marshal
पाकिस्तानचा लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर याला तिथल्या शाहबाज सरकारकडून बढती देण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये दारुण पराभव झाला असला तरी, मुनिरला फील्ड मार्शल बनवण्यात आले आहे. यावरून तेथे लोकशाही ही केवळ मुखवटा असून खरी सत्ता कुणाच्या हातात आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. एकप्रकारे शरीफ सरकारने लष्कराला ‘या, आणि हवी तशी सत्ता सांभाळा’ असं खुलं आमंत्रणच दिलं आहे.
भारताकडून पराभव पत्करल्यानंतरही शाहबाज सरकार विजयाचा दावा करून चुकीच्या माहितीच्या आधारे पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करत आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने अनेक पाकिस्तानी लष्करी तळांचे नुकसान केले. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पण याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने त्यांचा लष्करप्रमुख असीम मुनीर याला बढती दिली.
हा निर्णय केवळ एक औपचारिक बढती नसून, लष्कराला सर्वोच्च सत्तेच्या खुर्चीत बसवण्याचा अधिकृत आदेशच आहे. ही बढती म्हणजे लष्कराच्या इशाऱ्यावर नाचण्याचा पगडीधारी शपथविधीच म्हणावा लागेल. न्यायव्यवस्था, संसद, प्रसारमाध्यमं सगळ्यांना वाकवून लष्कराची मर्जी राखणं, हेच पाकिस्तानच्या राजकारणाचं नवं समीकरण झालं आहे, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. फील्ड मार्शल हे पद पाकिस्तानात फारच मोजक्या अधिकाऱ्यांना मिळालं आहे, आणि इतिहास सांगतो की या पदावर बसलेल्यांनी देशात लष्करी हुकूमशाहीच राबवली आहे.
पाकिस्तानी सैन्यात फील्ड मार्शल हे सर्वोच्च पद आहे. यापूर्वी अयुब खान हा त्यांचा पहिला फील्ड मार्शल झाला होता. ज्याने नंतर पाकिस्तानानत लष्करी राजवट आणली होती. त्याच्या नंतर आता असीम मुनीर हा पाकिस्तानचा दुसरे फील्ड मार्शल बनला आहे. मुनीरच्या गणवेशावर अयुब खानप्रमाणे पाच स्टार असतील.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी, असीम मुनीरने द्विराष्ट्र सिद्धांताचा पुरस्कार केला होता आणि म्हटले होते की हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत. तो म्हणाला होता, ‘आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपले विचार, धर्म आणि परंपरा वेगळ्या आहेत. हा द्विराष्ट्र सिद्धांताचा पाया आहे.’
असीम मुनीरच्या या भडकावू भाषणानंतर काही दिवसांनी, 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये एक दहशतवादी हल्ला झाला. ज्यात 25 हून अधिक नागरिकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी सैन्यालाही धूळ चारली. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी छावण्या आणि हवाई तळ उडवून दिले. तरीही शाहबाज सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे.
पाकने हवाई दल प्रमुखाचा कार्यकाळही वाढवला
पाक सरकारने त्यांचा हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू याचाही सेवा कार्यकाळ एकमताने वाढवला आहे. भारतासोबतच्या अलिकडच्या संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. भारताने पाकिस्तानच्या 11 हवाई तळांवर अचूक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे मोठे नुकसान झाले.
शाहबाजकडून उपकारांची भरपाई
असीम मुनीरला फील्ड मार्शलचा दर्जा देऊन शाहबाज शरीफ त्याच्या जुन्या उपकारांची भरपाई करत आहे असे मानले जाते आहे. खरं तर, मुनीर यानेच या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शाहबाज शरीफ याच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजला विजय मिळवून देण्यास मदत केली होती. पाकिस्तानच्या निवडणुकीत लष्कराच्या हस्तक्षेपावरही मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले. एवढेच नाही तर मुनीरने शाहबाजच्या मार्गातील सर्वात मोठा काटा असलेल्या इम्रान खानलाही तुरुंगात टाकले टाकले होते.
असीम-शहबाजचे पंजाबी कनेक्शन
लष्करप्रमुख असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ दोघेही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून येतात. पाकिस्तानातील प्रत्येक सरकारी क्षेत्रात या प्रांतातील लोकांचे वर्चस्व आहे.

