

Pakistan takes 'emergency' steps for pharma supplies
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी औषधांचा पुरवठा सुरळित करण्यासाठी "आपत्कालीन तयारी" सुरू केल्याचे वृत्त आहे.
भारताने सिंधू जल करार थांबवल्यानंतर प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचा सर्व व्यापार स्थगित केला.
पण त्यामुळे पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे. पाकिस्तान औषध पुरवठ्यासाठी भारतावर अवलंबून आहे. आणि आता औषधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानने काही तत्काळ उपाययोजना केल्या असून, तेथील आरोग्य यंत्रणांनी "आपत्कालीन तयारी" सुरू केली आहे.
ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ पाकिस्तान (DRAP) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जरी औषध क्षेत्रावर बंदीचा अधिकृत आदेश आलेला नसला तरी तयारीसाठी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
2019 च्या संकटानंतर आम्ही अशा आपत्कालीन परिस्थितींसाठी तयारी सुरू केली होती. आता आम्ही आमच्या औषध गरजा भागवण्यासाठी पर्यायी स्रोतांचा सक्रियपणे शोध घेत आहोत."
सध्या पाकिस्तान औषधांसाठी लागणारा 30 ते 40 टक्के कच्चामाल, ज्यामध्ये API (ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स) आणि इतर प्रगत उपचार उत्पादने यांचा समावेश आहे याबाबत भारतावर अवलंबून आहे.
या पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने DRAP आता चीन, रशिया आणि युरोपमधील इतर देशांकडून पर्यायी पुरवठ्याचा शोध घेत आहे.
या योजनेचा उद्देश म्हणजे जिवावाचवणाऱ्या औषधांचा सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित करणे — ज्यामध्ये हायड्रोफोबिक लसी, साप आणि कुत्र्यांच्या विषाविरोधातील औषधे, कर्करोगावरील उपचार, मोनोक्लोनल अँटीबॉडीज आणि इतर महत्त्वाची जैवतंत्रज्ञान उत्पादने यांचा समावेश आहे.
DRAP ने तयारी सुरू केली असली तरी औषध उद्योगातील तज्ज्ञ जाणकारांनी मात्र पाकिस्तानने त्वरित पावलं उचलली नाहीत तर मोठ्या संकटाचा इशारा दिला आहे.
पाकिस्तान काही तयार औषधंही भारतातून घेतो, विशेषतः कर्करोगावरची औषधं, लसी, विशेषतः रेबीज व सर्पदंशावरील औषधेदेखील पाकिस्तानात भारतातून मागवली जातात, अशी माहिती आहे.
तरीही आरोग्य मंत्रालयाला अद्याप औषध आयातबंदीबाबत कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नाही. परिणामी औषध उद्योगाला पुरवठा साखळी खंडित होण्याची भीती वाटते आहे.
पाकिस्तान फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (PPMA) चे अध्यक्ष तौकीर-उल-हक यांच्या माहितीनुसार गुरुवारी औषध उद्योगातील प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने इस्लामाबाद गाठून व्यापार बंदीपासून औषध क्षेत्राला सूट देण्याची विनंती केली.
"आमची DRAP आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. आम्ही त्यांना सांगितलं की, भारतातून येणाऱ्या अनेक जिवनावश्यक औषधांचा कच्चा माल केवळ तिथूनच मिळतो, त्यामुळे औषध क्षेत्राला या बंदीतून सूट मिळावी," असं ते म्हणाले.
शिष्टमंडळाने स्पेशल इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन कौन्सिल (SIFC) कडेही याचिकेसाठी धाव घेतली, कारण औषधं आणि आरोग्याशी संबंधित व्यापार बंदीतून वगळणं हे रुग्णांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळीबार करून 26 जणांचा बळी घेतला, ज्यात बहुतेक पर्यटक होते. हा हल्ला 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला ठरला आहे.