

Nepal Bhote Koshi Flash Flood : नेपाळमधील तिबेट सीमेजवळ असलेल्या रसुवा जिल्ह्यात आज (दि.२६) भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून १०५ भारतीय पर्यटक आणि ३७ अनिवासी भारतीय (NRI) यांच्यासह जवळपास ३८४ नागरिक बेपत्ता आहेत. पुराच्या तीव्र लाटेमुळे रस्ते, पूल आणि व्यापारी पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत.
स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ च्या सुमारास रसुवागढी-तिमुरी भागात भोटे कोशी नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली. या पुराचा फटका रसुवासह शेजारील नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांनाही बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या ३८४ जणांमध्ये २९१ परदेशी आणि ९३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळ टुरिझम बोर्डाने स्पष्ट केले आहे की, ही यादी प्राथमिक असून ट्रॅव्हल एजन्सी आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने माहितीची पडताळणी सुरू आहे.
भोटे कोसी नदीच्या पाणी पातळीत अचानक झालेल्या वाढीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, रसुवा भागात झालेल्या पावसामुळे हा पूर आलेला नाही. सीमावर्ती तिबेटच्या बाजूला हिमनदीच्या सरोवराचा बांध फुटणे, दरड कोसळणे किंवा अन्य एखाद्या घटनेमुळे हे घडले असावे का, याची तपासणी अधिकारी करत आहेत. विभागाचे माहिती अधिकारी दिनकर कायस्थ म्हणाले, "आम्ही अजूनही या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत, त्यामुळे नेमके कारण अद्याप समजलेले नाही." त्यांनी असा इशाराही दिला की तिबेटच्या बाजूने असलेला धोका अद्याप टळलेला नाही आणि "आपल्याला सावध राहण्याची गरज आहे," असेही ते म्हणाले. अधिकाऱ्यांना अनौपचारिक माहिती मिळाली आहे की, तिबेटमध्ये दरड कोसळल्यामुळे नदीचा प्रवाह काही काळासाठी अडवला गेला असावा आणि त्यानंतर पाण्याचा प्रचंड लोंढा त्यातून बाहेर पडला असावा; मात्र, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
नेपाळमधील त्रिशुली नदीला आलेल्या पुराचे पाणी खालील भागात वाहून येत असल्याने भारतातील गंडक नदीच्या काठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी चर्चा करून एनडीआरएफ (NDRF) तुकड्या तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांतील प्रशासनाला पूर्णपणे सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये तिबेटच्या दिशेने कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या मोठ्या संख्येतील भाविकांचा समावेश आहे. काठमांडूतील ट्रॅव्हल एजन्सीनुसार, बुधवारी सीमा ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या ३९० यात्रेकरूंपैकी बहुतांश भाविकांशी दुपारनंतर संपर्क होऊ शकलेला नाही.
नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांना तात्काळ शोध व बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी १४ हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स आणि स्निफर डॉग्सची मदत घेतली जात आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या २६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही शोध सुरू आहे. लष्कराने जखमींवर उपचारासाठी त्रिशुली येथे आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. "या संकटसमयी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारताकडून सर्व प्रकारची मानवतावादी मदत आणि बचावकार्यात सहकार्य केले जाईल," असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.
या महापुरामुळे नेपाळच्या जलविद्युत क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. ३५४ मेगावॉट क्षमतेचे ८ कार्यरत जलविद्युत प्रकल्प आणि ५ निर्माणाधीन प्रकल्प पुरामुळेग्रस्त झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे आणि सुरक्षित स्थळी हलण्याचे आवाहन केले आहे.