Bilawal Bhutto on Masood Azhar | मसूद अझर पाकिस्तानात नाही! बिलावल भुट्टोंचा धक्कादायक दावा; म्हणाले- अफगाणिस्तानात असू शकतो...
Bilawal Bhutto statement on Masood Azhar Pakistanm Afganistan India
इस्लामाबाद : भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी आणि जैश ए मोहम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अझर पाकिस्तानात नाही, कदाचित तो अफगाणिस्तानात असू शकतो, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी केले आहे.
अलीकडेच अल जझीरा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे मसूद अझर नेमका कुठे आहे याची चर्चा सुरू झाली आहे.
मसूद अझर नेमका कुठे आहे, याची पाकिस्तान सरकारला माहिती नाही. जर भारताने खात्रीशीर पुरावे दिले की मसूद अझर पाकिस्तानात आहे, तर आम्ही त्याला अटक करण्यात आनंदच मानू, असेही ते म्हणाले.
भारताचे वारंवार आरोप, पाकिस्तानचा नकार
मसूद अझर याचा भारतावरील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांशी संबंध आहे. त्यात 2001 चा संसदेवरील हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, 2016 चा पठाणकोट हवाई तळावरचा हल्ला आणि 2019 चा पुलवामा आत्मघाती हल्ला यांचा समावेश आहे.
1999 साली कंधार अपहरण प्रकरणात भारतातील तत्कालीन भाजप सरकारला मसूद अझरला सोडावे लागले होते. 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले.
भारताने अनेक वेळा अझर आणि लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईद यांचे प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. मात्र पाकिस्तानने ते दोघेही पाकिस्तानात असल्याचे सातत्याने नाकारले आहे.
हाफिज सईदवर बंधने...
भुट्टो म्हणाले, "हाफिज सईद हा पाकिस्तान सरकारच्या ताब्यात आहे, तो मोकळा नाही. मसूद अझरचा मागोवा घेण्यात आम्हाला अपयश आले आहे. तो अफगाण जिहादच्या काळात अफगाणिस्तानात कार्यरत होता, त्यामुळे आम्हाला वाटते की तो सध्या अफगाणिस्तानात आहे."
पाश्चिमात्य देशांनी अफगाणिस्तान तालिबानच्या हाती सोपवले
भुट्टोंनी अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत म्हटले, "जर तो खरोखर अफगाणिस्तानात असेल, तर पश्चिम देशांनी तो देश अशा गटाच्या हवाली केला आहे ज्यांना कधी काळी त्यांनीच दहशतवादी म्हटले होते. जे नाटोसारखे बलाढ्य गट तिथे कारवाई करू शकले नाहीत, ते पाकिस्तानने कसे करावे?"
भारतीय हवाई कारवाईनंतर मसूदने केले होते वक्तव्य
बिलावल भुट्टोंचे हे विधान एप्रिल 22 रोजी पाहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे. त्यानंतर भारताने "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर तळावर आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुरिदके येथील मुख्यालयावर लक्षित हवाई कारवाई केली होती.
मसूद अझरने स्वतः कबूल केले की त्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि 4 सहकारी ठार झाले.
पाकिस्तानने एकीकडे मसूद अझरचे ठावठिकाण माहित नसल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे भारताने पुरावे आणि कारवाईची मागणी करत आपला दबाव कायम ठेवला आहे. दोन्ही देशांमध्ये वाढता तणाव लक्षात घेता, ही घडामोड भविष्यातील संबंधांवर परिणाम करू शकते.

