

Daniel Pearl's Father on Pakistani officers India Pakistan Conflict
इस्लामाबाद : भारतीय सैन्याने मुरिदके येथील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानातील सैन्य अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप व्यक्त होत आहे.
यूएसने "जागतिक दहशतवादी" म्हणून घोषित केलेल्या हाफिज अब्दुल रऊफसाठी याच अंत्यसंस्कारावेळी प्रार्थना करण्यात आली. यावेळी पाकिस्तान सैन्याचे गणवेशधारी जवान व जमात-उद-दावा संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना, 2002 मध्ये कराचीमध्ये अल-कायदाच्या ओमर शेखकडून अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांचे वडील जुडिया पर्ल यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जुडिया पर्ल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “भारतीय लष्कराने अब्दुल रऊफ अज़हरला ठार केल्याची बातमी ऐकून अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. हा तोच अज़हर आहे ज्याने माझ्या मुलाच्या अपहरणामध्ये अप्रत्यक्ष भूमिका बजावली.”
डॅनियल पर्लचे वडील पुढे म्हणाले, “अब्दुल रऊफ अज़हर थेट अपहरणात सामील नव्हता, पण त्याच्या कटकारस्थानामुळे ओमर शेख सुटला आणि डॅनियलच्या मृत्यूचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे तोदेखील जबाबदार आहे.”
भारतीय लष्कराने अलीकडेच ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील बहावलपूर आणि मुरिदके येथे अचूक हवाई हल्ले केले.
या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा (JeM) वरिष्ठ कमांडर अब्दुल रऊफ अज़हर, IC-814 विमान अपहरणाचा मास्टरमाइंड ठार झाल्याचे वृत्त आहे. याच अज़हरच्या प्रयत्नांमुळे ओमर शेखची सुटका झाली होती आणि ज्याने नंतर डॅनियल पर्लला फसवून किडनॅप केले होते.
डॅनियल पर्ल यांची सहकारी आणि वॉल स्ट्रीट जर्नलची माजी पत्रकार असरा नोमानी यांनी CNN-News18 ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, “बहावलपूर हे ठिकाण गेल्या 23 वर्षांपासून माझ्या लक्षात आहे. डॅनियलने जैश-ए-मोहम्मदच्या कार्यालयाच्या दारावर थेट ठोठावलं होतं.
पाकिस्तान अनेक वर्षांपासून दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. पाकिस्तान दहशतवादाची फॅक्टरी आहे. मसूद अज़हरचा भाऊ इब्राहीम, हाच यामागचा मेंदू होता. मला आशा आहे की भारत सरकार डॅनियलच्या वडिलांशी संपर्क साधेल.”
डॅनियल पर्ल यांच्या मृत्यूला जबाबदार ठरवलेल्या दहशतवाद्यांच्या मृत्यूनंतरही पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांची त्यांना दिलेली श्रद्धांजली आणि शोकसभा यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
न्यायाच्या दिशेने पाऊल उचलल्याबद्दल भारताचं कौतुक होत असताना, पाकिस्तानच्या भूमिकेवर मात्र तीव्र टीका होत आहे.