India-Bangladesh Relation : सीमेवर 'मानवी ढाल'; जमात-ए-इस्लामीच्या घोषणेनंतर भारत-बांगलादेश सीमेवर तणाव वाढणार?

जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांची आघाडी
India-Bangladesh Relation
शफिकुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश जमात-ए-इस्लामी११ पक्षांच्या विरोधी आघाडी भारत बांगलादेश सीमेवर मोर्चा काढणार आहे. Pudhari
Published on
Updated on

India-Bangladesh Relation : बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष 'जमात-ए-इस्लामी' आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भारत-बांगलादेश सीमेवर एका भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. भारताकडून होणारी कथित 'पुश-इन्स' (बळजबरीने घुसखोरी) आणि सीमावर्ती भागात बांगलादेशी नागरिकांच्या हत्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला जात आहे. हसीना-विरोधी विद्यार्थी संघटना असलेल्या 'नॅशनल सिटिझन पार्टी'ने (NCP) सीमावर्ती भागात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना 'मानवी ढाल' (human shield) तयार करण्याचे आवाहन केले आहे. नवी दिल्लीत भारत आणि बांगलादेश यांच्यात सीमाविषयक उच्चस्तरीय चर्चा सुरू असताना आणि दोन्ही देशांमधील ४,०९६ किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव वाढत असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे.

जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांची आघाडी

ढाका येथील जमात-ए-इस्लामीच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी (दि.१०) पत्रकार परिषदेत या आघाडीने कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले. आघाडीचे समन्वयक आणि जमात-ए-इस्लामीचे सहाय्यक सरचिटणीस ए.एच.एम. हमीदुर रहमान आझाद यांनी सांगितले की, १२ जून रोजी सर्व सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि महत्त्वाच्या सीमा चौक्यांवर निषेध रॅली काढल्या जातील. त्यानंतर १५ जून रोजी राजधानी ढाका येथे एक भव्य निषेध सभा आणि मिरवणूक काढली जाईल. या आघाडीमध्ये नॅशनल सिटिझन पार्टी, बांगलादेश खिलाफत मजलिस, खिलाफत मजलिस, अमर बांगलादेश पार्टी आणि जातीय गणतंत्रिक पार्टी यांसारख्या प्रमुख विरोधी संघटनांचा समावेश आहे. ही आघाडी १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी स्थापन करण्यात आली होती.

India-Bangladesh Relation
India South Korea Relations: मैत्री संबंधांचे नवे पर्व

'मानवी ढाल' तयार करण्याचे आवाहन

पत्रकार परिषदेत बोलताना एनसीपीचे मुख्य समन्वयक नसीरुद्दीन पटवारी म्‍हणाले की, 'झिरो लाईन'जवळ राहणारे बांधव आणि भगिनी मानवी संकटाचा सामना करत आहेत. त्यांनी 'बॉर्डर गार्ड बांगलादेश' (BGB) अधिक बळकट करण्याची मागणी केली. दहशतवादी, तस्कर किंवा गुन्हेगारांना बांगलादेशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सीमावर्ती भागातील रहिवाशांनी 'मानवी ढाल' करावी, असे आवाहनही त्यांनी केले. जमातचे नेते ए.एच.एम. हमिदुर रहमान आझाद यांनी आरोप केला की, बीएनपी (BNP) सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) गोळीबारात १९ बांगलादेशी नागरिक मारले गेले आणि २४ जण जखमी झाले. याव्यतिरिक्त, बीएसएफ आणि म्यानमारच्या अराकान आर्मीने ८३ लोकांना ताब्यात घेतले किंवा बळजबरीने नेले. पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी सरकारवर टीका करताना त्यांनी आरोप केला की, प्रशासन भारताबाबत मवाळ धोरण अवलंबत आहे आणि सीमा सुरक्षेबाबत गंभीर नाही.

India-Bangladesh Relation
India Nepal border dispute |"सीमावादात तिसऱ्या पक्षाची गरज नाही' :नेपाळच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले खडे बोल

भारताने सर्व आरोप फेटाळले

भारताने हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारत कोणालाही बळजबरीने सीमेपलीकडे पाठवत नाही. द्विपक्षीय करारांनुसार, योग्य पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच बेकायदेशीर परदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवले जात आहे. सुरळीत प्रत्यार्पण सुनिश्चित करण्यासाठी बांगलादेशने राष्ट्रीयत्वाची पडताळणी प्रक्रिया जलद करावी, असे आवाहन आम्ही करतो. भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगाल आणि आसामसारख्या राज्यांमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ४,८०० बेकायदेशीर स्थलांतरितांना बांगलादेशात पाठवण्यात आले आहे, तर आणखी ८३६ जण कोठडीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news