पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्रणालीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील बळींची संख्या १३३ वर गेली आहे. आंदोलन चिघळल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले, संचारबंदी लागू केली; तरीही विद्यार्थ्यांची हिंसक निदर्शने थांबत नसल्याने सरकारही आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांना पाहताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
बांगला देशात विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीतील आरक्षणाविरोधात आंदोलन छेडले आहे. १९७१ च्या बांगला देश युद्धात शहीद झालेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरीत ३० टक्के आरक्षण दिले जाते. या घटनेवरून विद्याथ्यर्थ्यांनी आंदोलन सुरू केले असून, यास हिंसक वळण लागले आहे. आंदोलन चिघळल्याने बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी लष्कराला पाचारण केले आणि संचारबंदी लागू केली. देशातील वाढत्या हिंसक घटनांना थांबवण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आल्यानंतर रस्त्यावर सैनिकांनी गस्त सुरू केली आहे. तरीही शनिवारी विद्यार्थ्यांनी कारागृहावर हल्ला केला आणि अटक केलेल्या निदर्शकांची सुटका केली.
या आठवड्यातील हिंसाचारात आतापर्यंत १३३ लोकांचा मृत्यू झाला आहे, जे १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारसाठी मोठे आव्हान ठरत आहे. शेख हसीना नियोजित राजनैतिक दौऱ्यासाठी देश सोडणार होत्या, परंतु विरोधामुळे त्यांनी दौरा रद्द केला. दुसरीकडे, आरक्षण पद्धतीवरून सुरू असलेल्या गदारोळात आज बांगलादेशचे सर्वोच्च न्यायालय वादग्रस्त नोकरीचा कोटा रद्द करायचा की नाही यावर निर्णय देणार आहे.
दरम्यान, ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयाने भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांना भारतामध्ये पाठविण्यात येत आहे. नेपाळ आणि भूतानमार्गे विद्यार्थी सुखरूप मायदेशी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरू केली असून, बांगला देशातून १००१ विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. अद्याप बांगला देशात ४ हजार विद्यार्थी अडकले आहेत.