Global Water Scarcity | जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला पाणी टंचाईची तीव्र समस्या- रिपोर्ट
पुढारी ऑनलाईन डेस्क : पाण्याची टंचाई ही जगभरातील चिंतेची बाब बनली आहे. जी सध्या जगभरातील अनेक क्षेत्रांवर परिणाम करत आहे. जगातील तब्बल २५ देशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एका अहवालानुसार, जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येचा समावेश असलेल्या २५ राष्ट्रांना दरवर्षी पाणी टंचाईची तीव्र समस्येचा सामना करावा लागत आहे. (Global Water Scarcity )
लोकसंख्या वाढ, शहरीकरण, औद्योगिकीकरण, हवामान बदल आणि पाणी व्यवस्थापनाची अकार्यक्षम पद्धती यासारख्या बाबींमुळे पाणीटंचाईसारख्या समस्या वाढत असताना दिसत आहे. पाणी टंचाईचे परिणाम हे लक्षणीय आणि दूरगामी असू शकतात, त्याच्यामुळे समाज आणि पर्यावरणाच्या विविध घटकांवर याचा परिणाम होवू शकतो.
Global Water Scarcity : २५ देशांना पाणी टंचाईचा सामना
वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या ॲक्वेडक्ट वॉटर रिस्क ॲटलसच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईचा सामना सामना करावा लागत आहे. जगभरातील तब्बल २५ राष्ट्रे, म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्या सध्या वार्षिक पाणी टंचाईला सामोरी जात आहेत. जागतिक स्तरावर, अंदाजे ४ अब्ज व्यक्ती दरवर्षी किमान एक महिना पाण्याची टंचाई सहन करतात. हा आकडा २०५० पर्यंत जवळपास ६० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
बहरीन, सायप्रस, कुवेत, लेबनॉन ….
अहवालात असे दिसून आले आहे की जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येचा समावेश असलेल्या २५ राष्ट्रांना दरवर्षी पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यापैकी, बहरीन, सायप्रस, कुवेत, लेबनॉन आणि ओमानमध्ये सर्वात जास्त परिणाम जाणवतो. हे प्रदेश दुष्काळाच्या अल्प कालावधीतही पाणी टंचाईला बळी पडू शकतात. सर्वात जास्त पाण्याची टंचाई अनुभवणारे प्रदेश हे प्रामुख्याने मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील आहेत, ज्यात तब्बल ८३ टक्के लोकसंख्येला अत्यंत उच्च पाणी टंचाई समस्येचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त, दक्षिण आशियामध्ये, लक्षणीय ७४ टक्के लोकसंख्येला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतो.
डब्ल्यूआरआयच्या जल कार्यक्रमातील जलवाहिनी डेटा लीड आणि अहवाल लेखक समंथा कुझ्मा, यांनी सीएनएन या वृत्तसंस्थेला सांगितले की, मी जवळपास 10 वर्षांपासून पाण्यासाठी काम करत आहे. पाणी हा ग्रहावरील आपला सर्वात महत्वाचा स्त्रोत आहे, आणि तरीही आपण त्याचे व्यवस्थापन योग्य रितीने करत नाही.
हेही वाचा
- FIFA Womens World Cup : ‘वुमन्स वर्ल्डकप’च्या अंतिम सामन्यात इंग्लडचा प्रवेश; ऑस्ट्रेलियाचा ३-१ ने पराभव
- India’s first polar research ship : भारताचे पहिले ध्रुविय संशोधन जहाज लवकरच तयार होणार! मंत्री रिजिजू यांनी मांडली योजना
- Hindi films in Manipur : मणिपूरवासियांनी २३ वर्षांनंतर पाहिला हिंदी चित्रपट; बॉलिवूडचा आनंद घेत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष