

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच सरकार कोसळण्याची शक्यता आहे. ते काही दिवसांचे पाहुणे आहेत. सरकारचा भाग असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग-कायद (पीएमएल-क्यू) चे प्रमुख चौधरी परवेझ इलाही यांनी हा दावा केला आहे. इलाही म्हणाले की, माझ्या माहितीनुसार हे सरकार १०० टक्के अडचणीत आहे. आता ते वाचवणे खूप कठीण आहे. खुद्द पंतप्रधानांनी जाऊन आपल्या खासदारांची समजूत घातली तर सरकार आणखी काही दिवस जाऊ शकते, अन्यथा ते पडणे साहजिक आहे.
पाकिस्तानमधील विरोधकांनी इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासाठी २८ मार्च रोजी मतदान होणार आहे. इम्रानचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे सुमारे १८ ते २० खासदार सरकारच्या विरोधात मतदान करणार असल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे.
चौधरी परवेझ इलाही हे पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक मानले जातात. ते पंजाब प्रांतातील आहेत त्यांच्या पक्षाचे पाच खासदार सध्या इम्रान सरकारला पाठिंबा देत आहेत. पंजाब प्रांतात सध्या इम्रानचा पक्ष सत्तेत असून याही ठिकाणी इलाहीचे काही आमदार सरकारला पाठिंबा देत आहेत. इमरानसोबत पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांचीही खुर्ची जाणार असल्याच्या बातम्या मीडियात आहेत.
परवेझ इलाही पुढे म्हणाले की, इम्रानला आता बाहेर पडून मित्रपक्षांकडे जावे लागेल. आता उद्धटपणा आणि शिवीगाळ किंवा धमकावून चालणार नाही. त्यांना त्यांच्या मित्रपक्षांचे मन वळवावे लागेल. तसे झाले नाही तर सरकारला कोणीही वाचवू शकणार नाही.
आता सरकार कसे चालणार हे लपून राहण्याची बाब नाही. इम्रान यांच्याच पक्षाचे अनेक खासदार नाराज असून तेही २८ मार्चला सरकारविरोधात मतदान करतील यात शंका नाही. खान यांना स्वतःचा पक्ष सांभाळता येत नसताना ते सहकाऱ्यांना कसे सांभाळणार? आज सरकार अडचणीत असताना खान विविध गोष्टी बोलत आहेत आणि खासदारांना अमिष दाखवत अनेक आश्वासने देत आहेत. चार वर्षे ते काय करत होते हा प्रश्न आहे. मग त्यांच्या सहकार्यांना त्याची पर्वा का नव्हती. असा सवार इलाही यांनी केला.
'द डॉन'च्या वृत्तानुसार, इम्रान सरकारला सध्या १७९ खासदारांचा पाठिंबा आहे. बहुमतासाठी १७२ खासदारांची आवश्यकता असते. मित्रपक्षांचे ७ खासदार या सरकारला पाठिंबा देत आहेत. १८ ते २० खासदार विरोधकांसोबत जाण्यास तयार आहेत, कारण त्यांना इम्रानसोबत भविष्य दिसत नाही. तसे झाल्यास विरोधकांची एकूण संख्या २०० च्या जवळपास असेल आणि सध्याच्या सरकारकडे १६० पेक्षा कमी खासदार उरतील. अशा स्थितीत सरकार पडणे निश्चित आहे.