

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व मंत्री व आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाणार नाहीत. जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने आपण गुवाहाटीला जाणार नसून आमचे 40 रेडे दर्शनासाठी गुवाहाटीला जात असल्याचं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी म्हटलं आहे.
भाजप शिंदे गटाची जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मेळावा पार पडला या मेळाव्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. मात्र जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने गुलाबराव पाटील या आमदारांसोबत गुवाहाटीला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या दौऱ्याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यातील सगळेच आमदार जात आहे. पण मला जाता येणार नाही. निवडणूक असल्याने मी मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती केली आहे. ज्यादिवशी आम्ही इकडं येऊ तेव्हा २७ ची रात्र असेल. मग २८ ला आम्हाला मतदारसंघात यावं लागेल. त्यादिवशी माघारी घेण्याचा दिवस आहे. आपला एकतरी प्रतिनिधी असावा यासाठी मी विनंती केली आहे. पण निश्चितपणे बाकीचे आमदार जाणार आहेत असं सांगितले. त्यावेळी आमचे ४० रेडे जात आहेत. दर्शन घ्यायचं आहे असं अजब विधान त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येकाने अभ्यास करून बोललं पाहिजे. महामहीम राष्ट्रपती असो की राज्यपाल असोत. राजे राजे आहेत. त्यामुळे राजांवर कोणी बोलू नये असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर टीका केली.
महाराष्ट्रातील चाळीसगाव हे कर्नाटकात मध्ये घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रश्नासाठी सर्व पक्षांनी एकत्रित आला पाहिजे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. या वक्तव्याला मंत्री गुलाबराव पाटील यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. संजय राऊत यांच्या भूमिकेला मी पाठिंबा देतो, असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. पहिले राज्य मग राष्ट्र हे उद्दिष्ट असलं पाहिजे. हे राज्य टिकवण्यासाठी अनेकांना आहुती दिली आहे. राज्यासाठी सर्वांनी आपला पक्ष बाजूला ठेवून एकत्र आला पाहिजे, असेही मत व्यक्त करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.