

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
वाहतूक सुरक्षेच्या नावाखाली नावेली परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॅमेऱ्यांची संख्या आणि त्यांच्या स्थानावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अवघ्या काहीशे मीटरच्या अंतरावर अनेक कॅमेरे आणि वाहतूक नियंत्रक दिवे उभारण्याची गरज काय, असा सवाल नागरिकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांत वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात दंडाच्या नोटीसा मिळाल्याने संतापात भर पडली आहे.
नावेली चर्चसमोरील चौकात एआय कॅमेरा बसविण्यास मंगळवारी स्थानिकांनी विरोध केला. जॉर्ज बॅरेटो, सिद्धेश भगत यांच्यासह नागरिकांनी कॅमेरा बसविण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.
चर्चसमोरील वाहतूक नियंत्रक दिव्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी अनेकदा कोंडी होत असल्याचा आरोप जॉर्ज बॅरेटो यांनी केला. विशेषतः शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत या भागात मोठी गर्दी होते. दररोज दोन हजारांहून अधिक विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि पादचाऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
नावेली चर्चपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर भुर्तादो पेट्रोलपंपाजवळील नावेली जंक्शन येथेही एआय कॅमेरा बसवण्यात आला आहे. नावेलीमध्ये तीन ठिकाणी वाहतूक नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली असून, एवढ्या कमी अंतरावर कॅमेरे बसविण्याची आवश्यकता काय,
असा सवाल सिद्धेश भगत यांनी केला. कॅमेऱ्यांची ठिकाणे कोणत्या वाहतूक सर्वेक्षणाच्या आधारे निश्चित केली, यंत्रणेसाठी किती खर्च झाला आणि त्याचा वाहतूक कोंडी कमी करण्यास किती फायदा होणार, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.