

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
पेडणे तालुक्यातील खाजने येथील तृप्ती नितीन राऊळ (४० वर्षे) यांनी कोलवाळ येथील पुलावरून शापोरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती राऊळ मंगळवारी सकाळी बसने कोलवाळच्या दिशेने गेल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे त्या कोलवाळ येथील एका गॅरेजमध्ये काही वेळ थांबल्या. तिथे त्या फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या.
फोनवर बोलताना त्या भावूक होऊन रडत असल्याची माहिती मिळाली आहे. पाऊस कमी झाल्यानंतर त्या गॅरेजमधून बाहेर पडल्या. त्यानंतर कोलवाळ पुलाच्या परिसरात गेल्या. काही वेळाने त्यांनी शापोरा नदीत उडी घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने नदीत शोधमोहीम राबवून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह सुरुवातीला म्हापसा येथील आझिलो जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे पाठवण्यात आला आहे.
तृप्ती राऊळ यांच्या पश्चात पती, दोन लहान मुली तसेच सासू-सासरे असा परिवार आहे.