

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
पेडणे तालुक्यात गेल्या काही काळापासून वावर असलेल्या 'ओंकार' या जंगली हत्तीमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीच्या वावरामुळे शेती-बागायतीच्या नुकसानीचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोप सरपंच सुबोध महाले आणि तोरसेच्या सरपंच पूजा साटेलकर यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन हत्तीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली.
यावेळी मोप, तोरसे आणि परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. हत्तीच्या वारंवार होणाऱ्या वावरामुळे शेतकरी चिंतेत असून, मेहनतीने उभी केलेली शेती व बागायती काही वेळातच उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. रात्रीच्या वेळी हत्तीचा वावर होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
या बैठकीला वन अधिकारी नवीन कुमार, अश्विन परिहार, उपवनसंरक्षक जिस वर्की, वनपाल हरेश महाले यांच्यासह वन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देत 'ओंकार'च्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याची मागणी केली. तसेच लोकवस्ती आणि शेती-बागायतींकडे हत्तीचा प्रवेश रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
मोपच्या उपसरपंच सिया धुरी, तोरसेचे पंच सदस्य रमेश बुटे, छाया शेट्ये, माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी वन अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडत हत्तीच्या उपद्रवामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या मते, पिके हाता तोंडाशी आलेली असताना हत्तीच्या वावरामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ हत्तीच्या हालचालींवर नजर ठेवण्यापुरती कारवाई न करता नागरिकांच्या जीविताचे संरक्षण, शेती-बागायतींची सुरक्षा आणि संभाव्य नुकसान रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
हत्ती लोकवस्तीत येऊ नये यासाठी वन विभागाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच हत्तीचा मागोवा घेण्यासाठी नियमित गस्त वाढवावी आणि रात्रीच्या वेळी वन कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
हत्तीमुळे नागरिकांच्या जीविताला तसेच शेती-बागायतींना धोका निर्माण होऊ नये, यासाठी वन विभाग, पंचायत आणि स्थानिक नागरिक यांच्यात समन्वय ठेवण्याची गरज आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
संवेदनशील भागांत कर्मचारी तैनात करा...
'ओंकार' लोकवस्ती किंवा शेती क्षेत्रात आल्यास तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा कार्यरत ठेवावी, संवेदनशील भागांत आवश्यक कर्मचारी तैनात करावेत आणि हत्तीच्या हालचालींचे नियमित निरीक्षण करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.