

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर १६ ते २१ मार्च दरम्यान राज्यातील वाहतूक खात्याकडे ३.११९ वाहनांची नोंदणी झाली. यातील २,७१० वाहनांची नोंदणी १६ ते १९ मार्च या चार दिवसांतच झाली आहे.
२० आणि २१ मार्च या दोन दिवसांत ४०९ वाहनांची नोंदणी झाली आहे. यावर्षी १९ मार्च रोजी गुढीपाडवा, तर २१ मार्च रोजी रमजान ईद साजरी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, १६ ते २१ मार्च दरम्यान नोंदणी झालेल्या एकूण वाहनांपैकी सर्वाधिक २,१७४ या दुचाकी होत्या. यादरम्यान, ७५५ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली.
तसेच ८३ प्रवासी वाहने, ७६ प्रवासी दुचाकी, ११ तीन चाकी, ९ अवजड वाहने, तर ११ अन्य प्रकारच्या वाहनांची नोंदणी झाली आहे. आरटीओ कार्यालानुसार पाहता म्हापसा येथे आरटीओमध्ये सर्वाधिक ६२३ वाहनांची नोंदणी झाली आहे.
मडगाव आरटीओ मध्ये ४८७, डिचोलीमध्ये ४३९ वाहनांची नोंदणी झाली. वरील कालावधीत पणजी आरटीओमध्ये ४२६, फोंडामध्ये ३७६, वास्कोमध्ये २५७, केपेत १९८, काणकोणमध्ये १०३, पेडण्यात १८९ वाहनांची नोंदणी झाली. सर्वात कमी ४१ वाहनांची नोंदणी धारबांदोडा आरटीओ कार्यालयात झाली.
राज्यात १ जानेवारी ते २१ मार्च २०२६ दरम्यान एकूण २१ हजार ८५६ वाहनांची नोंदणी झाली आहे यामध्ये १४ हजार ७४२ दुचाकी, ५.१०७चारचाकी, ६२७प्रवासी वाहने, तर ५६० मालवाहू १४१ अवजड, ७७ मध्यम स्वरूपाची माल वाहतूक वाहने, तर ५१ तीन चाकी वाहनांचा समावेश आहे.
वाहतूक खात्याला मिळाले १०६ कोटी
राज्यात १ जानेवारी ते २१ मार्च २०२६ दरम्यान एकूण नोंदणी झालेल्या वाहनांपैकी सर्वाधिक १६ हजार ८९२ पेट्रोल वाहने आहेत. तर यादरम्यान २,५४२ ई वाहने, १,३४९ डिझेल, तर ३१८ सीएनजी वाहनांचा समावेश आहे. वरील कालावधीत वाहतूक खात्याला कर व पस्वान्यांच्या स्वरूपातून १०६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.