

पणजी : राज्यात २६ ठिकाणी बसवलेल्या एआय कॅमेऱ्यांवरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शनिवार, दि. १ ऑगस्टपासून दंड आकारणी सुरू होणार आहे.
एआय कॅमेरे बसवले तेव्हा दर दिवशी हजारो वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत होते. आता नियम उल्लंघनाची संख्या उतरून दर दिवशी १ हजारावर पोहोचली आहे. तसेच वाहनांचे इन्शुरन्स, प्रदूषण प्रमाणपत्र घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
राज्यात अपघातांचे व अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हेल्मेट घालण्यासह वाहतूक नियमांचे पालन केले जावे म्हणून सरकारचा प्रयत्न सुरू आहे. सर्वत्र वाहतूक व्यवस्थापनासाठी वाहतूक पोलिस ठेवणे शक्य नसल्याने एआय कॅमेरे बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रथम पातळीवर ९२ ठिकाणी एआय कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला आहे. सध्या २६ ठिकाणी एआय कॅमेरे बसवले आहेत.
हेल्मेट न घातल्यास, सीटबेल्ट न लावल्यास, वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास त्याची नोंद एआय कॅमेऱ्यांवर होत आहे. पूर्वी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण जास्त होते. आता ते कमी झाले आहे. ही स्थिती समाधानकारक आहे, असे वाहतूक संचालक अरविंद खुटकर यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार, वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी एआय कॅमेरे बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.