

पणजी : पोलिस खात्यातील सहा निरीक्षकांना पदावनत (डिमोशन) करण्यात आले होते. हा आदेश रद्द करून पदावनती केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा निरीक्षक पद बहाल करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलिस महानिरीक्षक अजय कृष्णन शर्मा यांनी जारी केला आहे.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पोलिस अधिकारी टेरेंस वाझ हंगामी निरीक्षकपदी तर संध्या गुप्ता, विलेश दुर्भाटकर, सुनील गुडलर, सुशांत गावस आणि राहुल धामशेकर यांना कार्यवाहक निरीक्षक पद बहाल करण्यात आले आहे. दरम्यान,
त्यांच्याविरोधात असलेल्या गुन्हेगारी किंवा इतर स्वरुपाच्या खटल्याचा निकाल आल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई होणार असल्याचा स्पष्ट उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. पोलिस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार वरील आदेश जारी करण्यात आला आहे. पोलिस
उपनिरीक्षक आनंद नार्वेकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात २०२५ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा केला होता. त्यांनी आपल्याबरोबर खात्यात सेवेत रुजू झालेल्या चार उपनिरीक्षकांना पदोन्नती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.