

साखळी : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवार, १६ जुलैपासून पुन्हा जोर धरला. शुक्रवारी सकाळी घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे साखळीतील वाळवंटी नदीला अचानक पूर आला. अवघ्या दोन तासांत नदीने धोक्याची पातळी गाठत किनारे ओलांडून वाहण्यास सुरुवात केली. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात आली.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. सुमारे दहा दिवस पावसाने दडी मारल्यामुळे शेतीसह पाणीपुरवठ्याबाबतही चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. रात्रभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी घाटमाथा आणि महाराष्ट्र सीमेलगतच्या डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाल्याने वाळवंटी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली.
सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भरतीची वेळ असल्याने नदीचे पाणी तुंबून राहिले आणि नदी किनारे ओलांडून वाहू लागली. बंदिवाडा-विठ्ठलापूर येथील श्री देव तोणयेश्वर मंदिराच्या पेडाला पाण्याने वेढा घातला. तसेच काजीवाड्याकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली.
नदीची पाणीपातळी तीन मीटरपेक्षा अधिक झाली होती. दरम्यान, साखळी बाजारातील नाल्याची पाणीपातळी सुमारे पावणेतीन मीटरपर्यंत पोहोचल्याने बाजारातील पूरप्रतिबंधक योजनेअंतर्गत पंप सुरू करून नाल्यात साचलेले पाणी नदीपात्रात सोडण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. संध्याकाळपर्यंत नदीची पाणीपातळी कमी झाल्याने पूरस्थितीही ओसरली.