

दोनापावला येथे कामगार दिन उत्साहात
कामगारांच्या विकासासाठी कटिबद्ध : मुख्यमंत्री
पणजी : खासगी उद्योगात २० वर्षांहून अधिक काळ सेवा केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार आहे. तशी घोषणा शुक्रवारी कामगार दिन सोहळ्ळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. दोनापावला येथे शुक्रवारी आयोजित कामगार दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली, यावेळी कामगार खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात, कामगार व रोजगार आयुक्त राजेश आजगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, या उपक्रमांतर्गत, पात्र कामगारांना १५ हजार रुपयांचा धनादेश मिळेल. जो कामगार विभागामार्फत दिला जाईल. कामगारांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक दशकांपासून सेवा बजावलेल्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कौतुकाची भेट देणे हा या घोषणेचा उद्देश आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कामगार दिनानिमित्त कामगारांसाठी ५ कल्याणकारी योजनांचे अनावरण केले, कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी सामाजिक सुरक्षा आणि संधी मजबूत करणे हा त्यामागील हेतू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी, मुख्यमंत्र्यांनी २० औद्योगिक कामगारांना प्रतिष्ठेचा श्रम गौरव - श्रमिक मित्र पुरस्कार २०२६ प्रदान केला. हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात अपवादात्मक समर्पण, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट सेवा प्रदर्शित केली आहे.
संप नको, चर्चेला या! कामगारांना काही समस्या असल्यास संप करणे, आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणे आदीला प्राधान्य न देता सरकारशी चर्चेला यावे. आपण व आपले सरकार नेहमीच चर्चेसाठी तयार आहे. संपातून तोडगा निघत नाही, तर कंपन्या व सरकारशी चर्चा केल्यास तोडगा निघू शकतो. गेल्या सात वर्षांत आपण ८ ते १० वाद सोडवले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.