

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सुमारे ८० टक्के स्थानिक काजू उत्पादकांनी आपल्या उत्पादनांना जीआय टॅग मिळवून बाजारात आणले, तर सध्या विक्रीत असलेल्या कमी दर्जाच्या आणि बनावट काजूला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो, असे मत राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे नोडल अधिकारी दीपक परब यांनी व्यक्त केले. ते काजू महोत्सवाच्या तांत्रिक चर्चासत्रात बोलत होते.
या चर्चासत्राला अन्न व औषध प्रशासनाचे रिचर्ड नरोन्हा, उद्योजक हेंजल वाझ, रोहित झांट्ये आणि केशव प्रकाश उपस्थित होते. दीपक परब म्हणाले, गोव्याच्या काजूची चव आणि गुणवत्ता इतर काजूपेक्षा वेगळी व सरस असल्यामुळेच त्याची जगभर ओळख निर्माण झाली आहे. मात्र, सध्या गोव्याच्या नावाखाली राज्याबाहेरील कमी दर्जाचे काजू विकले जात आहेत.
ही समस्या रोखण्यासाठी स्थानिक काजू उत्पादनांना जीआय टॅग मिळवून देणे आणि त्यांचे योग्य ब्रँडिंग करणे अत्यावश्यक आहे. यामुळे शेतकरी, उत्पादक आणि ग्राहक या तिन्ही घटकांना फायदा होईल. बनावट काजू विक्री रोखण्यासाठी जीआय टॅग असलेलीच उत्पादने विकण्याचा निर्णय प्रभावी ठरू शकतो. काजू उत्पादक संघटनेने २०२६ पासून फक्त जीआय काजू विकण्याची शिफारस सदस्यांना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.