

पणजी : पुढारी वृत्तसेवा
निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवडणूक रद्द होणे धक्कादायक असून सत्ताधारी भाजपने निवडणूक आयोगावर दबाव आणून हा निर्णय घडवून आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी दिली.
पणजी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, आमदार अॅड, कार्लोस फेरेरा आदी उपस्थित होते. चोडणकर यांनी आरोप केला की, सत्ताधारी पक्षाने लोकशाही 'हायजॅक' केली असून निवडणूक आयोगाला हाताशी धरून उशिरा निवडणूक जाहीर करून ती रद्द करण्याचे नाटक केले.
या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित होता, म्हणून हा डाव रचला गेल्याचा दावा त्यांनी केला. रवी नाईक यांच्या निधनानंतर तीन महिन्यांत निवडणूक जाहीर होणे अपेक्षित असताना ती पाचव्या महिन्यात जाहीर करण्यात आली, हे चुकीचे आहे. तसेच निवडणूक रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका करणारी व्यक्ती भाजप समर्थक असल्याचाही आरोप त्यांनी केला.
२ एप्रिल रोजी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ८ एप्रिलला निकाल देणे संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, ठाकरे यांनीही हा प्रकार लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप करत भाजपने पराभवाची भीती वाटल्याने निवडणूक रद्द करण्याचे कारस्थान रचल्याचा दावा केला.
अॅड. कार्लोस फेरेरा यांनी, काही प्रकरणांत निवडणुकीनंतर एक वर्ष आमदार न मिळाल्यास निवडणुका रद्द झाल्याची उदाहरणे देशात आहेत. मात्र, न्यायालयाचा अंतिम निर्णय काय असेल हे स्पष्ट नसल्याने हस्तक्षेप वाचिका दाखल करण्यात आली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेस जिंकणार 27 जागा
आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस २७ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा माणिकराव ठाकरे यांनी केला. सत्ताधारी पक्षाविरोधात जनतेत नाराजी असल्याने मतदार कॉंग्रेसकडे वळतील, असे ते म्हणाले.