

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ तयारीच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. शेकडो वर्षे जुनी झाडे, विशेषतः पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे वटवृक्ष, बिनधोकपणे तोडले जात असल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी कायमस्वरूपी स्थगितीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
'झाड तेच आणि जागा नवीन' असा देखावा मनपाकडून होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. महापौरांनी झाड तेच, जागा नवी ही भूमिका मांडली असली तरी, झाडे स्थलांतरित करताना आवश्यक असलेल्या शास्त्रीय प्रक्रियेचा अभाव असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
सिंहस्थासाठी योग्य नियोजन न करता ऐनवेळी वृक्षतोड करण्यात येत असल्याने हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. वृक्षतोडीनंतर फांद्या आणि लाकडे तसेच रस्त्यावर पडून राहिल्याचेही ओंगळवाणे चित्र शहरात दिसत आहे.
नियमानुसार वृक्षलागवडीसाठी छाटणी करण्याची विशिष्ट पद्धत असते, मात्र मनपाकडून करण्यात आलेली छाटणी इतकी चुकीची आहे की त्या झाडांचे पुनर्रोपण करणे अशक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवाद (एनजेटी) बेंचकडून सखोल चौकशी होण्याची शक्यता असून, महाराष्ट्र शासनाला याबाबत भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. संबंधित तांत्रिक कारणे पटण्यासारखी असल्यानंतरच न्यायालय त्याबाबत योग्य निर्णय देईल, असे चित्र आहे.
रस्त्याच्या मधोमध येत असलेल्या झाडांमुळे आतापर्यंत 66 अनेकांचा नाहक बळी गेलेला आहे. अशा धोकादायक व कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारी जुनी झाडे काढून त्यांचे दुसऱ्या जागेत पुनर्रोपण करणार आहोत. हरित लवादाने स्थगिती दिल्याने आता न्यायालयासमोर परिस्थिती मांडली केली जाणार आहे.
- विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक मनपा, नाशिक
झाडे स्थलांतरित करताना आवश्यक असलेल्या शास्त्रीय प्रक्रियेचा अभाव दिसून येतो. शिवाय वृक्षतोड करण्यात आलेल्या झाडांवरील जैवविविधतेचेदेखील मोठे नुकसान होत आहे.
- अंकुश मगजी, पर्यावरणप्रेमी