

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याने एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण अंतिम करण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलली असून विविध संबंधित घटकांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे मसुद्यात सुधारणा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सुधारित मसुदा चर्चा अहवाल माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांना सुपूर्द करण्यात आला. मंगळवारी पणजीतील पर्यटन भवन येथे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभाग तसेच गोवा टेक्नॉलॉजी असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान आयटी खात्याचे संचालक कबीर शिरगावकर यांनी भूषवले. बैठकीस डॉ. मिलिंद साखरदांडे (संयुक्त संचालक), डी. एस. प्रशांत, डॉ. कविता असनानी, मांगीरीश सालेलकर तसेच चे इतर सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत एआय धोरणाची उद्दिष्टे, महत्त्वाचे घटक आणि विविध क्षेत्रांतील उपयोग यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यानंतर सदस्यांनी मंत्री रोहन खंवटे यांची भेट घेऊन चर्चेचा अहवाल व सूचनांची प्रत त्यांना सादर केली.
मंत्र्यांनी सदस्यांशी संवाद साधत एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेत उपाययोजना करण्यावर भर दिला. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री खंवटे यांनी एआय धोरण १०० दिवसांत अंतिम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत.