

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड परिसरातील मुख्य रस्त्यांवरील फुटपाथ पूर्णतः अतिक्रमणाखाली गेल्याने पादचाऱ्यांचे हाल होत असून, नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या तीव्र होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नाशिकरोड परिसरातील मुख्य रस्त्यांवरील एकही फुटपाथ मोकळा नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सर्वत्र अतिक्रमण करून व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटल्याने पादचाऱ्यांसाठी असलेली जागाच संपुष्टात आली आहे.
बिटको चौक ते देवळाली गाव, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तसेच पोलिस स्टेशन ते बिटको चौक या मार्गांवर फुटपाथ पूर्णतः गायब झाले आहेत. नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते सत्कार पॉइंट या मार्गावर तर पायी चालण्यासाठी सुरक्षित जागाच उरलेली नाही.
त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या मध्यभागातून चालावे लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाकडून हॉकर्स झोन तयार केले असले तरी ठोस कारवाई होत नाही. मनपा अधिकाऱ्यांशी याबाबत माहिती विचारले असता सध्या बोलण्यास वेळ नाही, असे उत्तर मिळत आहे.
अनेक वेळा रस्त्यावर चालणाऱ्या पादचारी वाहनांची धडक बसून मृत्युमुखी पडले आहेत. मनपा प्रशासनाने अतिक्रमणाबाबत नीट लक्ष घालून नागरिकांना पायी चालण्यास अडचण निर्माण होणार नाही.
योगेश भोर, नगरसेवक, नाशिकरोड
आम्ही लाखो रुपयांचे गाळे खरेदी केले आहेत. फुटपाथवर विक्रीसाठी व्यावसायिक बसले कारणाने आम्हाला आमच्या गाड्या लावायला जागा राहत नाही. मनपा प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून फुटपाथ मोकळे करावे.
सलीम शेख, व्यावसायिक