

अजित पवारांचा मृत्यू अपघातच; घातपात नसल्याचे शरद पवारांचे स्पष्ट मत
संजय राऊतांचे वक्तव्य अशोभनीय असल्याची गिरीश महाजन यांची टीका
‘ऑपरेशन लोटस’ आरोपांवर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर
उबाठा गटाच्या राजकीय स्थितीवरही महाजनांचा हल्लाबोल
पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टर प्रकरणातही घातपात नसल्याचा दावा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अजित पवार यांचा मृत्यू अपघात असून, कुठलाही घातपात झाला नसल्याचे खुद्द शरद पवार यांनी मान्य केले असताना खा. संजय राऊत यांनी त्यांच्या अपघाती निधनाबद्दल केलेले वक्तव्य अशोभनीय आहे.
विकृत माणूसच असे वक्तव्य करू शकतो, अशा शब्दांत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग असल्याचा गंभीर आरोप उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
अजित पवारांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराचे पुरावे होते. ते स्वगृही येण्याच्या तयारीत होते, असा दावा करत त्यांच्या विमानाला झालेल्या अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ने नव्हे तर न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे.
नाशिकमध्ये मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. संजय राऊत हा विकृत माणूस आहे. अशा विकृत माणसाची कीव तरी कशाला करावी. अशा विकृतीमुळेच उबाठावर दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. २९ पैकी एका महापालिकेतही उबाठाचा महापौर होऊ शकलेला नाही.
उरलासुरला पक्ष वाचवायचा असेल तर उद्धव ठाकरेंनी अशा बोलबच्चन लोकांना बाजला करण्याची गरज आहे, असा सल्लाही महाजन यांनी दिला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला छत्रपती संभाजीनगर येथे तांत्रिक बिघाड झाला. या घटनेतही घातपात घडविण्यासारखा प्रकार नाही, असा दावाही महाजन यांनी केला.