

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात गाजलेल्या 'जॉब फॉर कॅश' कोट्यवधीच्या घोटाळ्याच्या चौकशीची सद्यस्थिती गोव्याच्या जनतेसमोर स्पष्ट करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्याचे पोलिस महासंचालकांकडे केली आहे. या कथित घोटाळ्यामुळे हजारो बेरोजगार युवक-युवती आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सरकारी यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणातील तपासात आतापर्यंत कोणती प्रगती झाली आहे, किती जणांची चौकशी करण्यात आली आहे, मुख्य संशयित कोण आहेत, कोणते पुरावे गोळा करण्यात आले आहेत आणि कोणत्याही प्रभावशाली व्यक्तींना संरक्षण दिले जात आहे का, याची माहिती जनतेला मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. या प्रश्नांची उत्तरे अनिश्चित काळासाठी दडवून ठेवता येणार नाहीत, असे चोडणकर म्हणाले.
गोवा काँग्रेस पक्ष राज्यातील युवकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि या प्रकरणातील संपूर्ण सत्य बाहेर येऊन दोषींना शिक्षा होईपर्यंत हा मुद्दा सातत्याने लावून धरणार आहे, असे गिरीश चोडणकर यांनी ठामपणे सांगितले. 'जॉब्स फॉर कॅश' हा केवळ भ्रष्टाचाराचा विषय नसून गोव्याच्या युवकांच्या भविष्यावर झालेला थेट आघात आहे. अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांना नोकरी मिळावी या आशेने आयुष्यभराची बचत खर्च केली असण्याची शक्यता आहे.
सरकारी नोकऱ्या मिळवून देण्याच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी झाल्याचे आरोप खरे ठरत असतील, तर हा गोव्याच्या इतिहासातील जनविश्वासाला दिलेला अत्यंत गंभीर धक्का आहे. या प्रकरणात गोवा पोलिसांच्या विश्वासार्हतेचीही कसोटी लागली आहे. राज्याचे सर्वोच्च पोलिस अधिकारी म्हणून पोलिस महासंचालकांची जबाबदारी आहे की, चौकशी कोणत्याही राजकीय दबावाशिवाय, निष्पक्षपणे आणि निर्भयपणे पार पडली पाहिजे.
गोव्याची जनता व्यावसायिकता, पारदर्शकता आणि निष्पक्षतेची अपेक्षा ठेवून आहे. या चौकशीचा वेग कमी करण्यासाठी, पुरावे कमकुवत करण्यासाठी किंवा राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी कोणताही दबाव टाकला जात नसावा, अशी काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे.
जर सत्य दडपण्याचा किंवा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर भाजप सरकार स्वतःच्या लोकांना संरक्षण देण्यात अधिक रस दाखवत आहे, असा संशय अधिक बळावेल, असे त्यांनी म्हटले आहे. गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट इशारा दिला की, कोणताही राजकारणी, दलाल किंवा प्रभावशाली व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही. गोव्याच्या युवकांना न्याय मिळालाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
सत्य बाहेर आलेच पाहिजे
सरकारे येतात आणि जातात; मात्र लोकशाही संस्थांचे कर्तव्य कायम असते. राजकीय सत्तेच्या बळावर कायमचे संरक्षण मिळेल असा भ्रम कोणी बाळगू नये. सरकार बदलतात, पण जनतेची न्याय आणि उत्तरदायित्वाची मागणी कायम राहते. सत्य बाहेर आलेच पाहिजे आणि या घोटाळ्यातील प्रत्येक दोषी व्यक्तीला कायद्यापुढे उभे केलेच पाहिजे, असेही चोडणकर म्हणाले.