

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दोनापावला येथील जेट्टीच्या खालावत चाललेल्या स्थितीबद्दल सामाजिक कार्यकर्त्या सेसिल रॉड्रिग्ज यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जेटीच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च होऊनही जेटीवरील सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आली आहे. जेटीवर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून ५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते.
तरीही, जेटीच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार, एजन्सीकडून कोणतीही देखभाल, दुरुस्ती केली जात नाही. या जेटीवर दररोज हजारो पर्यटक येतात. समुद्रावरील कमकुवत कठडे हे अपघाताला आमंत्रण देणारे आहेत.
या सगळ्या प्रकाराने संतप्त झालेल्या रॉड्रिग्ज यांनी या जेटीचे कोणत्या विभागाने, एजन्सीने नूतनीकरणाचे कंत्राट दिले आणि देखभालीसाठी जबाबदार असलेला सध्याचा कंत्राटदार कोण आहे, तसेच कठडे आणि दिवे गंजत आणि तुटत असताना कोट्यवधी रुपये कसे खर्च केले गेले, तसेच मूलभूत सुरक्षा आणि स्वच्छतेची खात्री दिली जात नसताना ५० रुपये का आकारले जातात? असे प्रश्न रॉड्रिग्ज यांनी विचारले आहेत.
सुरक्षितता द्या, मगच शुल्क घ्या: रॉड्रिग्ज सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा पर्यटन विभागामार्फत दोनापावला जेटीच्या संरचनात्मक सुरक्षेची तत्काळ तपासणी करावी, रेलिंग आणि दिव्यांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच कराराच्या अटी, वापरलेला निधी आणि देखभालीसाठी जबाबदार असलेल्या संस्थेची सार्वजनिक माहिती जाहीर करावी आणि जोपर्यंत सुरक्षितता सुनिश्चित होत नाही, तोपर्यंत प्रवेश शुल्क स्थगित करावे, अशा मागण्या सेसिल रॉड्रिग्ज यांनी केल्या आहेत.
संरक्षक कठडे, फरशा, दिव्यांची दुर्दशा
जेटीवरील संरक्षक कठडे गंजलेले, सैल झालेले आणि अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. यामुळे पर्यटकांना विशेषतः मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट धोका निर्माण झाला आहे. जेटीवरील दिवे बंद आहेत, फरशी खराब झाली आहे आणि गंज मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. नूतनीकरणानंतर अल्पावधीतच प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या जेटीकडे दुर्लक्ष झाले आहे.