

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री आमदार विरेश बोरकर यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. आंदोलकांच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा करू. तोपर्यंत आंदोलन मागे घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मात्र, आमदार बोरकर यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असे जाहीर केले.
यावेळी आमदार विरेश बोरकर यांनी तीन मागण्या सरकारला सादर केल्या. यात मंत्रिमंडळ बैठकीत कलम ३९ अ रद्द करण्याचा ठराव घ्यावा, ३९ अ अंतर्गत मंजूर असलेले सर्व प्रकल्प रद्द करण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करावे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३९ अ रद्द करण्याचे विधेयक आणून ते सरकारने मंजूर करून घ्यावे.
या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असे आमदार बोरकर यांनी सांगितले. जमीन रुपांतरणाचे कलम ३९ (अ) हटविण्यासाठी, गोव्यातील जमिनी राखून ठेवण्यासाठीचे आंदोलन मंगळवारी (दि. २४) ही सुरू होते.
आंदोलनात उपोषण सुरू केल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा प्रकृती खालावल्याने दाखल करण्यात आलेले आमदार विरेश बोरकर आज सकाळी ११ वाजता पुन्हा या आंदोलनात सहभागी झाले.
संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह आंदोलनस्थळी जात आंदोलकांशी चर्चा करीत आपण या विषयावर अधिवेशात चर्चा करू, असे आश्वासन दिले. गेले पाच दिवस आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला त्यांनी नगर नियोजन कार्यालयात आंदोलन केले होते.
पोलिस बळाचा वापर करून आमदार बोरकर यांना उचलून त्यांना व बोरकर यांना कार्यालयातून बाहेर काढले होते. त्यानंतर त्यांनी पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते, तर सोमवारी सायंकाळी आंदोलकांनी नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या बंगल्यावर मोर्चा नेत रात्रभर तिथेच ठाण मांडले होते.
सध्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या समवेत येऊन आमदार विरेश बोरकर यांची आझाद मैदानावर भेट घेतली. यावेळी डॉ. सावंत यांनी बोरकर यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली