

केरी : पुढारी वृत्तसेवा
गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना जोडणारा तसेच पर्यटकांच्या पसंतीचा निसर्गरम्य चोर्ला घाट सध्या सुरक्षेच्या गंभीर समस्येला सामोरा जात आहे. घाटातील धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टरयुक्त सुरक्षा चिन्हे आणि वेगमर्यादा दर्शविणारे बोर्ड नसल्याने चालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
पावसाळ्यात दाट धुके, निसरडे रस्ते आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे घाटातील प्रवास अधिकच ड धोकादायक बनत असून -प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल 7 वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. दररोज शेकडो खासगी वाहने, पर्यटकांच्या गाड्या, दुचाकीस्वार तसेच अवजड ट्रक चोर्ला घाटातून प्रवास करतात.
घाटातील अनेक तीव्र वळणे, खोल दऱ्या आणि अचानक येणारे उतार वाहनचालकांसाठी आव्हान ठरत आहेत. मात्र अशा संवेदनशील ठिकाणी धोकादायक वळण, सावकाश चला वेगमर्यादा, अपघात प्रवण क्षेत्र, यू-टर्न, ओव्हरटेकिंग बंद, हॉर्न वाजवू नका, धुकेप्रवण क्षेत्र अशा मूलभूत सूचना फलकांचाही अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेषतः बाहेरगावाहून येणारे चालक महामार्गावरील वेग कायम ठेवून घाटात प्रवेश करतात. घाटातील वळणांचा अंदाज न आल्याने अचानक ब्रेक लावावे लागतात. काही ठिकाणी रस्ते अरुंद असून समोरून येणाऱ्या वाहनांना वाट देताना वाहनचालकांची कसरत होते.
घाटातील अनेक भागात रस्त्यालगत मजबूत संरक्षक कठडे नसल्याने अपघात झाल्यास वाहन थेट दरीत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या काही ठिकाणी कठडे घालण्याचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी चुकून फलक दिसतात.
घाटात पोलिस गस्त हवी...
स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि पर्यटकांकडून घाटातील महत्त्वाच्या ठिकाणी तातडीने दिशादर्शक फलक, वेगमर्यादा बोर्ड, रिफ्लेक्टरयुक्त सुरक्षा चिन्हे, दरडप्रवण क्षेत्रांची सूचना, आपत्कालीन मदत क्रमांक तसेच पर्यटनस्थळांची माहिती देणारे फलक उभारण्याची मागणी होत आहे. यासोबतच रस्त्यावरील पांढरे पट्टे नव्याने रंगविणे, सौरऊर्जेवर चालणारे फ्लॅशिंग सिझल बसविणे, सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे आणि घाटात नियमित पोलिस गस्त ठेवण्याची मागणीही जोर धरत आहे.
हिरवाईने नटलेला घाट...
चोर्ला घाट हा केवळ वाहतुकीचा मार्ग नसून गोवा आणि कर्नाटकातील महत्त्वाचे पर्यटन आकर्षण मानले जाते. हिरवाईने नटलेला परिसर, धुक्याने व्यापलेले डोंगर, पावसाळ्यात कोसळणारे धबधबे आणि थंड हवामान अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे पर्यटकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.