

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात मागील पाच वर्षांत रेंटल वाहनांमुळे २२७ अपघातांची नोंद झाली आहे. यात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे राज्यात अपघात सत्र सुरूच आहे. अपघात सत्र रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी सरकारने 'रेंट अ कॅब' आणि 'बाईक'ची सुविधा सुरू केली; मात्र, आता ती त्रासदायक ठरत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
वाहन भाड्याने देण्यापूर्वी मालकांनी पर्यटकांना रस्ते आणि वाहतूक नियमांची माहिती द्यावी. 'मद्यपान करून वाहन चालवणार नाही,' असे हमीपत्र पर्यटकांकडून घेणे अनिवार्य करावे. अपघात घडल्यास चालकाचा परवाना निलंबित करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत रेंट अ बाईक'चे ५८ आणि 'रेंट अ कॅब'चे १६९, असे एकूण २२७ अपघात झाले. 'रेंट अ बाईक' मुळे ८ आणि 'रेंट अ कॅब' मुळे १४ जणांना प्राण गमवावे लागले. मृत्यू, गंभीर दुखापत आणि वाहनांचे मोठे नुकसान झाल्यासच गुन्हे नोंदवले जातात.
मात्र, अनेकदा पर्यटक खटले टाळण्यासाठी तडजोड करून प्रकरणे मिटवतात. त्यामुळे अनेक अपघातांची नोंदच होत नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यातील नोंर्दपिक्षा प्रत्यक्षात अपघातांची आकडेवारी जास्त आहे.
सर्वसमावेश तोडगा काढण्याची गरज
मंत्री खंवटे 'रेंट अ कार' व्यवसायात चाललेला गलथानपणा रोखणे गरजेचे. गोव्यात 'कुछ भी चलता है' अशी परिस्थिती होऊ नये. बेभानपणे 'रेंट अ कार' चालवणाऱ्यांमुळे गोव्यातील लोकांचा जीव जातो. यावर सर्वसमावेशक तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.