पणजी; पुढारी वृत्तसेवा: गोव्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या डिचोली तालुक्यातील साखळी येथे श्री विठ्ठल मंदिरामध्ये आज (दि.२९ जून) आषाढी एकादशीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधिवत पूजा केली. सुरुवातीला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यानी पहाटे अभिषेक केल्यानंतर लगेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी त्यांच्या पत्नी प्राध्यापिका सुलक्षणा सावंत यांच्यासोबत विठ्ठल, रुक्मिणी आणि राही या दैवतांची पूजा केली. (Ashadhi Ekadashi)
वाळवंटी नदीच्या किनारी वसलेले विठ्ठल मंदिर हे अतिप्राचीन असे मंदिर असून, राणे कुटुंबियांच्या पुर्वजांनी ते बांधलेले असल्यामुळे सुरुवातीला पूजेचा मान राणे कुटुंबियांना मिळतो. गेली अनेक वर्षे गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हेच पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये अभिषेक करत होते. आज त्यांचे सुपुत्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंदिरामध्ये अभिषेक केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सपत्नीक पूजा केली.
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्येही आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरण असून, जे भाविक पंढरपूरला पायी जाऊ शकलेले नाहीत त्यांनी आपल्या गावातून दिंडीच्या माध्यमातून साखळी येथे पायी चालत जाणे पसंत केले. विठ्ठल मंदिरामध्ये पूजा, भजन कीर्तन व प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर ही दिंडी पथके पुन्हा आपापल्या गावी रवाना झाली. या दिंडी पथकामध्ये महिला व बालकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता.
संपूर्ण महाराष्ट्रासोबत गोव्यातही आषाढी एकादशी उत्साहाने साजरी होत आहे. आपण आज साखळी येथील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये विधिवत पूजा केली आणि विठ्ठलाकडे गोमंतकीयांना सुख-समृद्धी देण्याची मागणी केली. तसेच जे भाविक तथा वारकरी पंढरपूरला पायी चालत गेले आहेत ते सुखरूप परतू दे अशी कामना व्यक्त करत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
आज आषाढी एकादशीनिमित्त साखळी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आषाढी एकादशीनिमित्त गोवाभर भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. दरवर्षी गोव्यातील अनेक वारकरी पथके पंढरपूरला पायी चालत जातात आणि विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन परत येतात. ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ती दिंडी पथके तथा वारकरी साखळी येथे येतात. या सर्व वारकऱ्यांना आणि तमाम गोमंतकीयांना आपण आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत असून, विठ्ठलाकडे आपण गोमंतकीयांना सुख समृद्धी लाभो दे अशी मागणी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Ashadhi Ekadashi)
हे ही वाचा :