गोव्यातील प्रत्येक निवडणूक आम्ही लढवू : आदित्य ठाकरे | पुढारी

गोव्यातील प्रत्येक निवडणूक आम्ही लढवू : आदित्य ठाकरे

पणजी ; पुढारी ऑनलाईन : गोव्यातील घराघरात शिवसेना पोहोचली आहे. गोव्यात वीज आणि पाणी प्रश्न आहेत. जे वचन आम्ही गोव्याला देऊ ते करून दाखवू, यापुढे गोव्यातील प्रत्येक निवडणूक आम्ही लढवू, असे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.

आदित्य ठाकरे सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. ठाकरे म्हणाले, गोव्यातील घराघरात शिवसेना पोहोचली आहे. शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण घराघरत पोहोचलं. आम्ही निवडणूक लढवणारचं. आम्हाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. गेल्या पाच वर्षात एनडीएच्या मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. आम्ही विश्वासघात करत नाही, आम्ही मैत्री जपतो.

यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. गोव्यातील जनतेचा विकास झाला की ठराविक पक्षाचा विकास झाला? गोव्यात वीज आणि पाण्याचे प्रश्न आहेत. मग गोव्यात नक्की कुणाचा विकास झाला? शिवसेनेने खुलेपणाने मैत्री जपली. शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो.

शिवसेनेने कधीही लपवाछपवी केली नाही. कुणाला पाठिंबा द्यायचा हे जनता ठरवेल. जे वचन आम्ही गोव्याला देऊ ते करून दाखवू. आमचं ध्येय विकासाचे आणि मैत्रीचे आहे. आमचा कुठ्याही पक्षाशी शत्रुत्व नाही. राजकीय वैचारिक मतभेद आहेत. विरोधकांना आमची भीती वाटत असल्याने ते आमच्यावर टीका करताहेत.

पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. ब्लेम गेम आम्हाला आवडत नाही. आम्ही श्रेय मिळवण्यासाठी काम करत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Back to top button