पणजी : सत्ता आणणाराच ठरणार प्रभावी चाणक्य..! | पुढारी

पणजी : सत्ता आणणाराच ठरणार प्रभावी चाणक्य..!

पणजी : विलास ओहाळ
विधानसभा निवडणुकीसाठी सध्या राज्यात एकूण अकरा पक्ष आपले नशिब आजमावत आहेत. त्यापैकी मुख्यत्वे लढत असणार आहे ती भाजप, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष आणि तृणमूल-मगोप युती अशा चार पक्षांच्या उमेदवारांमध्ये. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार प्रबळ मानले जात असले तरी राज्यात सत्ता स्थापन करण्यात जो पक्ष यशस्वी ठरेल, त्या पक्षाचा निवडणूक प्रभारी खरा चाणक्य ठरणार आहे, हे नक्की.

राज्यात भाजप, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष आणि तृणमूल-मगोप युती या पक्षांबरोबरच शिवसेना-राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड, जय महाभारत असे छोटे-छोटे पक्षही रिंगणात आहेत. त्या पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून जे काम पाहत आहेत, त्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे पी. चिदंबरम, आम आमदी पक्षाच्या आतिषी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीसाठी प्रफुल्ल पटेल यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली आहे. त्यातील फडणवीस, चिदंबरम, आतिषी, मोईत्रा आणि राऊत यांच्या चाणक्य नितीची खरी कसोटी मानली जात आहे. प्रचाराचे आता उर्वरित बारा दिवस राहिले आहेत. निवडणुकीचे चित्र आजपासून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत असल्याचे दिसत आहे.

सर्व विरोधी पक्षांचा नारा भाजप हटाव असाच आहे. त्यात भाजप तिसर्‍यांदा सत्ता आणण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. भाजपने नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फौज प्रचारात उतरविली आहे. त्यामुळे पुन्हा सत्ता आणण्यासाठी फडणवीस यांना प्रभारी सी. टी. रवी यांचे सहकार्य किती फलदायी ठरले, निकालानंतर स्पष्ट होईल. त्याशिवाय पी. चिदंबरम यांचे मिळत असलेले मार्गदर्शन पक्षाच्या कार्यकर्त्यांत आणि प्रचारात रंग भरू लागली आहे. आम आदमी पक्षाने गत निवडणुकीत आलेल्या अपयशातून धडा घेत स्थानिक पातळीपासून काम सुरू केले होते. पक्षाच्या नेत्या आतिषी यांचे मार्गदर्शन किती यश मिळवून देतेय, हेही पहावे लागणार आहे. त्याचबरोबर तीन महिन्यांत राज्यातील राजकारणात आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत असलेल्या तृणमूल काँग्रेसची धुरा महुआ मोईत्रा यांनी सांभाळली असली तरी त्यांना मार्गदर्शन रणनीतीकार व आयपॅकचे संस्थापक प्रशांत किशोर यांचे राहिले आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन किती यशस्वी झाले हेही 10 मार्चलाच कळेल.

राष्ट्रवादीची जबाबदारी उमेदवारांवरच

शिवसेनेला या निवडणुकीत फार मोठ्या यशाची अपेक्षा नसली तरी काहीतरी धक्कादायक निकाल लागेल, असे वाटते. त्यामुळे संजय राऊत यांची राजनीती किती कामी आली हे निकालानंतर पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीची मदार स्वतः उमेदवारांनाच पेलावी लागली असल्याचे चित्र आहे. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राज्याचा भार असला तरी मागील निवडणुकांत पक्षाची कामगिरी पाहता, आताही तिच स्थिती आहे.

पाहा व्हिडिओ : समलैंगिक असलेल्या अंजली – सुफीची ‘अनोखी’ प्रेम कहाणी | The Story of Lesbian Couple

Back to top button