

IT Fresher Salary India: देशातील आयटी सेवा क्षेत्रात गेल्या वीस वर्षांत मोठी वाढ झाली. जागतिक प्रोजेक्ट्स, मोठ्या क्लायंट्स आणि कोट्यवधींची उलाढाल हे सगळं बदललं. मात्र एक गोष्ट मात्र तशीच राहिली आहे… ती म्हणजे फ्रेशर्सचा पगार.
आजही मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये नव्या कर्मचाऱ्यांना मिळणारे सुरुवातीचे पॅकेज साधारण 3 ते 3.1 लाख रुपयांच्या आसपास आहे. हाच पगार 2008 च्या सुमारासही होता. तेव्हा Tata Consultancy Services (TCS) आणि Infosys सारख्या कंपन्यांनी फ्रेशर्ससाठी हे वेतन ‘स्टँडर्ड’ केलं होतं.
त्या काळात हा पगार चांगला मानला जात होता. कारण घरभाडं, जेवण, प्रवास आणि इतर खर्च तुलनेने कमी होता. पण आज चित्र पूर्णपणे बदललं आहे.
बेंगळुरू, हैदराबाद, पुणे यांसारख्या आयटी शहरांमध्ये राहणीमान खूप महाग झालं आहे. घरभाडं, अन्नधान्य, आरोग्य खर्च, प्रवास हे सगळंच वाढलं आहे. त्यामुळे नोकरी लागूनही अनेक तरुण काही महिन्यांतच आर्थिक ताण अनुभवायला लागतात.
HR तज्ज्ञांच्या मते, उद्योगाची कमाई वाढली, पण त्याचा फायदा फ्रेशर्सपर्यंत पोहोचलेला नाही. महागाई, शिक्षणाचा खर्च आणि शहरांतील महाग जीवनशैलीमुळे पगार पुरेनासा झाला.
यामागचं एक मोठं कारण म्हणजे इंजिनीअरिंग पदवीधरांची प्रचंड संख्या. दरवर्षी देशात सुमारे 15 लाखांहून अधिक इंजिनीअर विद्यार्थी बाहेर पडतात. मात्र त्यातील फार थोडेच थेट क्लायंट प्रोजेक्टसाठी तयार असतात. यामुळे कंपन्यांकडे उमेदवारांची भरपूर उपलब्धता असते आणि त्यामुळे कंपन्यांना पगारात वाढ करण्याची गरज वाटत नाही.
आयटी कंपन्यांचे मॉडेल हे मोठ्या प्रमाणात भरती आणि कमी खर्चावर आधारित आहे. त्यामुळे फ्रेशर्सच्या पगारात मोठी वाढ करणं त्यांच्या दृष्टीने अवघड होतं.
आजचा फ्रेशर फक्त डिग्री घेऊन येत नाही. त्याच्याकडून डिजिटल टूल्सचं ज्ञान, क्लायंटशी संवाद, सतत नवं शिकण्याची तयारी या सगळ्यांची अपेक्षा असते. तरीही सुरुवातीचा पगार मात्र कमी आहे.
तज्ज्ञ सांगतात की AI, क्लाउड, सायबर सिक्युरिटीसारख्या विशेष कौशल्यांमध्ये मात्र वेतन चांगलं मिळतं. अशा रोल्ससाठी 6 ते 12 लाखांपर्यंत पॅकेज दिलं जातं, तर काही जनरेटिव्ह AI प्रोफाइल्समध्ये ते 20 लाखांहूनही पुढे जातं. पण सर्वसामान्य फ्रेशरसाठी ही दारं अजूनही उघडली नाहीत.
HR क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे की सध्याची पगाररचना फार काळ टिकणारी नाही. शिक्षण खर्च आणि शहरातील महागाईमुळे तरुण लवकर नोकरी सोडत आहेत. पहिल्या 12 ते 18 महिन्यांतच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी नोकरी बदलत आहेत.
भविष्यात पगार हा केवळ अनुभवावर नाही, तर कौशल्यांवर ठरणार आहे. स्किल अपग्रेड, करिअर आणि उत्पादनक्षमतेशी जोडलेलं वेतन, यावरच आयटी क्षेत्राची पुढची दिशा अवलंबून असेल.