

Tobacco Poverty Trap India: देशातील तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका नव्या संशोधनानुसार, जर कुटुंबांनी तंबाखूवर होणारा खर्च थांबवून तो पैसा इतर गरजांवर खर्च केला, तर सुमारे २ कोटींपेक्षा अधिक कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधरु शकते.
हा अभ्यास ICMR-NICPR आणि Tata Institute of Social Sciences यांच्या संशोधकांनी केला असून तो BMJ Global Health मध्ये प्रकाशित झाला आहे. देशभरातील तंबाखू वापर आणि त्याचा आर्थिक परिणाम यावर मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला हा पहिलाच अभ्यास मानला जात आहे. या अभ्यासानुसार, देशातील सुमारे १०.६ टक्के कुटुंबं फक्त तंबाखूवरचा खर्च थांबवून स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात.
अभ्यासात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सर्वात गरीब कुटुंबं आपल्या मासिक उत्पन्नाच्या सुमारे ६.४ टक्के हिस्सा तंबाखूवर खर्च करतात. मर्यादित उत्पन्न असताना हा खर्च त्यांच्या दैनंदिन गरजांवर परिणाम करतो आणि घराचं बजेट बिघडवतो. विशेषतः ग्रामीण भागात हा खर्च आणखी जास्त असून, काही कुटुंबं ७ टक्क्यांपर्यंत उत्पन्न तंबाखूवर खर्च करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण अधिक वाढते.
संशोधनानुसार तंबाखू केवळ आरोग्यासाठी घातक नाही, तर आर्थिकदृष्ट्याही मोठं ओझं आहे. अंदाजे २ कोटी कुटुंबं फक्त तंबाखू सोडल्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात. ही सवय कुटुंबांना गरिबीत अडकवून ठेवते, असंही या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
भारतामध्ये तंबाखू खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात सुमारे २६.७ कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात, जे प्रौढ लोकसंख्येच्या जवळपास चौथ्या भागाइतके आहे. यामुळे दरवर्षी १० लाखांहून अधिक मृत्यू होतात, ही गंभीर बाब आहे.
तंबाखू सेवनामुळे तोंडाचा, घशाचा आणि फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. याशिवाय हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका देखील वाढतो. दीर्घकाळ तंबाखू सेवन केल्यास त्याचे परिणाम आणखी गंभीर होतात.