

Sam Altman AI Jobs: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आल्यानंतर सर्वसामान्यांपासून ते कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपर्यंत एकच भीती होती की, AI मुळे नोकऱ्या जाणार का? विशेषतः ChatGPT सारखी AI टूल्स लोकप्रिय झाल्यानंतर लाखो व्हाईट-कॉलर नोकऱ्या धोक्यात येतील, अशा इशाऱ्यांमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. पण आता या चर्चेला वेगळं वळण लागलं आहे.
सॅम ऑल्टमन यांनी स्वतःच आपल्या आधीच्या अंदाजावर यू-टर्न घेतला आहे. AI मुळे अपेक्षेइतक्या नोकऱ्या गेलेल्या नाहीत, हे मान्य करत त्यांनी “मी चुकीचा होतो” असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आयोजित कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलियाच्या परिषदेत बोलताना सॅम ऑल्टमन यांनी AI बाबतचा आपला आधीचा अंदाज चुकीचा ठरल्याचं कबूल केलं.
त्यांनी सांगितलं की, AI मुळे एंट्री-लेव्हल व्हाईट-कॉलर नोकऱ्यांवर मोठा परिणाम होईल, असं त्यांना वाटत होतं. मात्र, प्रत्यक्षात तसं फारसं घडलं नाही.
ऑल्टमन म्हणाले, “मला आनंद आहे की मी या बाबतीत चुकीचा ठरलो. मला वाटलं होतं की आतापर्यंत अनेक एंट्री-लेव्हल नोकऱ्या संपतील, पण प्रत्यक्ष परिणाम अपेक्षेपेक्षा कमी झाला.”
सॅम ऑल्टमन यांच्या मते, AI मुळे नोकऱ्या पूर्णपणे नाहीशा होणार नाहीत, तर काम करण्याची पद्धत बदलणार आहे. मानवी संवाद, सर्जनशीलता, निर्णयक्षमता आणि भावनिक समज यांसारख्या कौशल्यांची गरज कायम राहणार आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, माणसांमधील संवाद पूर्णपणे सॉफ्टवेअरने बदलणं अजूनही कठीण आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मानवी हस्तक्षेप आवश्यक आहे.
सॅम ऑल्टमन एकटेच नाहीत ज्यांनी AI बाबतचा सुर बदलला आहे. जेफ बेझोस यांनीही AI मुळे नोकऱ्या पूर्णपणे जाणार नाहीत, उलट कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढेल, असं मत व्यक्त केलं आहे.
एका मुलाखतीत बेझोस यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा रेडिओलॉजीसारखे व्यवसाय पूर्णपणे संपतील, हा दावा फेटाळून लावला. त्यांच्या मते, AI काही कामं ऑटोमेट करू शकतो, पण समस्या ओळखणं, सर्जनशील विचार करणं आणि सिस्टम डिझाइन करणं यासाठी माणसांची गरज आहे.
AI मुळे काही पारंपरिक कामं बदलू शकतात किंवा ऑटोमेट होऊ शकतात, हे खरं असलं तरी सध्याचं चित्र पाहता नोकऱ्या संपण्याऐवजी कामाचं स्वरूप बदलण्याची शक्यता अधिक आहे, असा सूर आता मोठ्या टेक कंपन्यांचा आहे.
यामुळे AI मुळे करिअर संपेल या भीतीऐवजी, AI सोबत काम करण्यासाठी स्वतःला अपग्रेड करणं हेच पुढच्या काळात अधिक महत्त्वाचं ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.