

Bengal Election Stock Market Impact: भाजपला पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळाल्यास भारतीय शेअर बाजारावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा अंदाज बाजार विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. विशेषतः गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून अल्प काळात बाजारात तेजी पाहायला मिळू शकते.
ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने याबाबत विश्लेषण करताना म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल जर एक्झिट पोलप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागले, तर ४ मे २०२६ नंतर भारतीय इक्विटी बाजार सकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपला आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये विद्यमान सरकारे सत्तेत कायम राहू शकतात, असे संकेतही एक्झिट पोलमधून मिळत आहेत.
विश्लेषकांच्या मते, पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यात भाजपची सत्ता आल्यास केंद्र सरकारला आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय अधिक वेगाने राबवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम बँकिंग, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील शेअर्सवर होऊ शकतो.
मात्र, बाजारातील ही तेजी दीर्घकाळ टिकेलच असे नाही, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती ही भारतासाठी मोठी चिंता आहे. त्यातच कमकुवत मान्सूनमुळे अन्नधान्य महागाई वाढण्याचा धोका आणि चालू खात्यातील तूट वाढण्याची शक्यता बाजारात दबाव निर्माण करू शकते. त्यामुळे निवडणूक निकालांमुळे आलेली तेजी काही काळानंतर कमी होऊ शकते.
याशिवाय, २०२७ च्या सुरुवातीपर्यंत कोणत्याही मोठ्या राज्याच्या निवडणुका नसल्यामुळे केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला जवळपास दहा महिन्यांचा ‘इलेक्शन-फ्री’ कालावधी मिळू शकतो. या काळात सरकार आर्थिक सुधारणा, ऊर्जा सबसिडीतील बदल आणि भारत-अमेरिका व्यापार करारासारख्या मोठ्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करू शकते, असेही विश्लेषणात म्हटले आहे.
शेअर बाजाराबाबत बोलायचे झाल्यास, तज्ज्ञांच्या मते बाजार काही काळ मर्यादित स्तरातच व्यवहार करु शकतो. निवडणुकीचा उत्साह ओसरल्यानंतर पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे लक्ष कंपन्यांचे निकाल, जागतिक अर्थव्यवस्था, तेलाच्या किंमती आणि महागाईवर असेल.
दरम्यान, कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढीबाबत मात्र सकारात्मक संकेत दिले जात आहेत. निफ्टी ५० कंपन्यांचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२७ मध्ये जवळपास १९ टक्क्यांनी वाढू शकतो, तर २०२८ मध्येही मजबूत वाढ कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी भारतीय बाजारात संधी कायम राहू शकते, असे मत बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
नोंद : गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.