

Healthy Weight Loss
न्यूयॉर्क: जागतिक स्तरावर वजन कमी करण्यासाठी सध्या ‘ओझेंपिक’ सारख्या 'GLP-1' औषधांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, वजन कमी होणे म्हणजे केवळ वजन काट्यावरील आकडा कमी होणे नव्हे, अशा शब्दांत तज्ज्ञांनी रुग्णांना धोक्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध भारतीय वंशाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय भोजराज यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या औषधांच्या अनिर्बंध वापराबद्दल चिंता व्यक्त केली असून, जीवनशैलीत बदल न करता केवळ औषधांवर अवलंबून राहणे भविष्यात महाग पडू शकते, असा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. भोजराज यांनी सांगितले की, "GLP-1 औषधांमुळे होणारे प्रत्येक वजन कमी होणे हे निरोगी आरोग्याचे लक्षण नसते. आजकाल लोक कमी खाणे म्हणजेच निरोगी होणे असा चुकीचा समज करून घेत आहेत, हाच यातील सर्वात मोठा धोका आहे."
'सेमाग्लुटाइड' सारखी औषधे भूक मंदावण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. मात्र, योग्य मार्गदर्शनाशिवाय केवळ भूक मारल्यास त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. डॉ. भोजराज यांच्या मते, "औषधांमुळे भूक कमी होते हे खरे आहे, पण जर तुम्ही पुरेशी प्रथिने न घेता, व्यायाम न करता आणि पचनसंस्थेकडे दुर्लक्ष करून वजन कमी करत असाल, तर तुम्ही चरबीऐवजी शरीरातील महत्त्वाचे स्नायू गमावत आहात. ही दीर्घकालीन पद्धत असू शकत नाही."
अशा प्रकारे वेगाने वजन कमी करताना शरीरातील स्नायू कमी झाल्यास (ज्याला वैद्यकीय भाषेत 'सार्कोपेनिया' म्हणतात) शरीराचा चयापचय दर कमालीचा खालावतो. परिणामी, जेव्हा रुग्ण हे औषध घेणे बंद करतात, तेव्हा वजन झपाट्याने पुन्हा वाढते आणि सोबतच रक्तातील साखर, रक्तदाब व कोलेस्टेरॉलची पातळी देखील बिघडते, असा इशारा त्यांनी दिला.
या औषधांच्या वाढत्या वापरासोबतच आता त्यांचे गंभीर आणि लपलेले दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. अमेरिकेत या औषधांमुळे पोटाचे गंभीर आजार, जसे की 'गॅस्ट्रोपारेसिस' आणि आतड्यांमधील अडथळे निर्माण झाल्याचा दावा करत रुग्णांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने देखील 'ओझेंपिक'च्या लेबलवर अनेक धोक्यांचे इशारे दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पित्ताशयाचे आजार, किडनीला गंभीर इजा, तीव्र बद्धकोष्ठता आणि आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होणे, शस्त्रक्रियेदरम्यान ॲनेस्थेशिया देताना फुफ्फुसांत अन्न जाण्याचा धोका, या आजारांचा समावेश आहे.
डॉ. भोजराज यांनी स्पष्ट केले की, ते या औषधांच्या पूर्णपणे विरोधात नाहीत, तर त्यांच्या जबाबदार आणि योग्य वापराचे पुरस्कर्ते आहेत. या औषधांचा शरीराला खरोखर फायदा करून घ्यायचा असेल, तर केवळ औषधांवर अवलंबून न राहता एका योग्य 'गेम प्लॅन'सह त्याचा वापर केला पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, जर कोणी ही औषधे घेत असेल, तर त्यांनी आहारात प्रथिनांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, स्नायू टिकवून ठेवण्यासाठी वजन उचलण्याचे व्यायाम केले पाहिजेत आणि औषध बंद केल्यानंतर वजन पुन्हा वाढू नये म्हणून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅन तयार ठेवला पाहिजे.