

Leptospirosis in Monsoon: पावसाळा सुरू होताच ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांसोबतच लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचाही धोका वाढतो. विशेषतः पूरस्थिती, साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसरामुळे हा आजार वेगाने पसरू शकतो. वेळेत उपचार न झाल्यास हा आजार किडनी, लिव्हर आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे या आजाराची माहिती आणि योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे (बॅक्टेरिया) होणारा आजार आहे. हा आजार थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरत नाही. मात्र, उंदरांसह काही प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित झालेले पाणी, चिखल किंवा माती यांच्या संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो.
पावसाच्या पाण्यात किंवा पूरग्रस्त भागातील साचलेल्या पाण्यात उंदरांची लघवी मिसळल्यास त्यामध्ये जीवाणू वाढतात. अशा पाण्याच्या संपर्कात आल्यावर त्वचेवरील जखम, खरचटलेला भाग किंवा डोळे, नाक आणि तोंडावाटे हे जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे पूरग्रस्त भाग, शेतातील चिखल, नाले किंवा साचलेल्या पाण्यातून चालताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
ज्या भागात अस्वच्छता अधिक आहे किंवा पाणी दीर्घकाळ साचून राहते, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना संसर्गाचा धोका जास्त असतो. तसेच शेतकरी, सफाई कर्मचारी, पूरग्रस्त भागात काम करणारे कर्मचारी, तसेच पावसाळ्यात नदी किंवा तलावात पोहणारे किंवा वॉटर स्पोर्ट्स करणाऱ्या व्यक्तींनाही या आजाराचा धोका अधिक असतो.
संसर्ग झाल्यानंतर साधारण 7 ते 10 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. काही रुग्णांमध्ये ती उशिरानेही दिसू शकतात.
यामध्ये तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे, डोळे लाल होणे, डोळ्यांत जळजळ किंवा खाज, उलटी, जुलाब, त्वचेवर पुरळ किंवा चट्टे येणे, तसेच लघवी करताना त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे डेंग्यू किंवा मलेरियासारखी वाटू शकतात. त्यामुळे ताप आल्यास स्वतःहून औषधे न घेता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लेप्टोस्पायरोसिसकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या आजारामुळे किडनी निकामी होणे, लिव्हरवर परिणाम होणे, हृदय बिघडणे किंवा मेंदूला सूज येणे यांसारखे आजार होऊ शकतात. मात्र, वेळेत निदान होऊन योग्य अँटिबायोटिक उपचार सुरू केल्यास बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात.
रुग्णाच्या लक्षणांनुसार रक्त तपासणी केली जाते. आवश्यकतेनुसार ELISA सारख्या विशेष चाचण्यांद्वारे लेप्टोस्पायरोसिसची खात्री केली जाते. त्यामुळे ताप किंवा इतर संशयास्पद लक्षणे असल्यास तपासणी उशिरा करू नये.
पावसाळ्यात शक्यतो साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे. जर तसे करणे अपरिहार्य असेल तर गमबूट किंवा पाण्यापासून संरक्षण करणारे बूट वापरावेत. पायावर जखम असल्यास ती वॉटरप्रूफ बँडेजने झाकावी. पूराच्या पाण्यातून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावेत. उकळून किंवा शुद्ध केलेले पाणीच पिण्याची सवय लावावी. तसेच घर आणि परिसर स्वच्छ ठेवून उंदरांचा वावर कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
पावसाळ्यात येणारा प्रत्येक ताप हा साधा व्हायरल ताप असेलच असे नाही. तो डेंग्यू, मलेरिया किंवा लेप्टोस्पायरोसिसचाही असू शकतो. त्यामुळे ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
महानगरपालिका आणि शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये लेप्टोस्पायरोसिसबाबत तपासणी, मार्गदर्शन आणि आवश्यक उपचार उपलब्ध असतात. वेळेत उपचार घेतल्यास या गंभीर आजारावर मात करता येते.