

मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करणारा आजार नसून त्याचा शरीरातील अनेक नैसर्गिक प्रक्रियांवर खोल परिणाम होतो. विशेषतः जखमा भरून येण्याच्या गतीवर आणि त्वचेच्या आरोग्यावर तो गंभीर परिणाम करतो. रक्तातील वाढलेली साखर शरीराच्या दुरुस्ती प्रक्रियेला धिमा करते. त्यामुळे जखमा उशिरा भरून येतात आणि त्यातून संसर्गाचा धोका वाढतो. या परिणामांचे ज्ञान असणे हे मधुमेहग्रस्तांसाठी तर महत्त्वाचे आहे. मानवी शरीर कसे कार्य करते आणि एखाद्या आजारामुळे ही प्रक्रिया कशी बदलते, याबाबत डॉ. महेश बरामदे यांच्याकडून जाणून घेऊया.
रक्तप्रवाहातील अडथळे
रक्तवाहिन्या अरुंद व कठीण झाल्यास शरीराच्या टोकाच्या भागांपर्यंत रक्त पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे त्या भागांना आवश्यक आक्सिजन, पोषकद्रव्ये कमी प्रमाणात मिळतात. जखमा लवकर भरत नाहीत. शरीराची रोगप्रतिकारक पेशी जखमेच्या ठिकाणी पोहोचण्याची क्षमता घटते, ज्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो
संसर्गाचा वाढलेला धोका
रक्तप्रवाह कमी होणे, नसांचे नुकसान, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे व त्वचेतील बदल या सर्व गोष्टी एकत्र येऊन मधुमेहींना संसर्गासाठी अधिक संवेदनशील बनवतात. किरकोळ जखमाही लवकर संसर्गित होऊ शकतात आणि गंभीर स्वरूप धारण करू शकतात. जखमेभोवती लालसरपणा, वेदना, विचित्र रंग आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
त्वचेतील बदल
मधुमेहामुळे रक्तवाहिन्या व नसांचे नुकसान झाल्याने त्वचेवरही थेट परिणाम होतो. यामुळे तिची संरक्षणात्मक भित म्हणून काम करण्याची क्षमता कमी होते. जखमा झाल्यास त्या लवकर भरून येत नाहीत. सूज व दाह अधिक काळ टिकून राहतात आणि जखमेची मजबुती कमी राहते. विशेषतः पायांसारख्या दाब येणाऱ्या भागांवर याचा परिणाम अधिक दिसतो
न्यूरोपॅथी (नसांवर परिणाम)
दीर्घकाळ उच्च रक्तशर्करेमुळे नसांची हानी होते. विशेषतः पाय व पोटऱ्यांमध्ये. त्यामुळे संवेदना कमी होतात आणि लहान-मोठ्या जखमा लक्षातच येत नाहीत. नसांची हानी झाल्याने ही सूचना मिळत नाही. त्यामुळे लहानशी जखम उपचार न मिळाल्याने गंभीर संसर्गात रूपांतरित होऊ शकते. म्हणून मधुमेहींनी पायांची नियमित तपासणी करणे आणिअत्यंत महत्त्वाचे आहे.
रोगप्रतिकारक शक्तीतील कमतरता
रक्तातील जास्त साखर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते. त्यामुळे अगदी किरकोळ जखमाही संसर्गाचे प्रवेशद्वार बनतात. जखमा लवकर न भरता दीर्घकालीन स्वरूप धारण करतात, जसे की मधुमेही पायातील अल्सर. हे अल्सर गंभीर संसर्गामुळे पाय कापण्यापर्यंत परिस्थिती नेऊ शकतात.