मोड आलेली धान्ये का खावीत ? अनेक उपयुक्‍त घटकांमुळे आहे ‘सुपरफूड’ | पुढारी

मोड आलेली धान्ये का खावीत ? अनेक उपयुक्‍त घटकांमुळे आहे 'सुपरफूड'

डॉ. भारत लुणावत

मोड आलेली धान्ये हा सर्वोत्कृष्ट आहार समजला जातो. यामध्ये असलेल्या अनेक उपयुक्‍त घटकांमुळे याला सुपरफूड असे म्हटले जाते. याचा शरीराला भरपूर फायदा होण्याकरिता याचे आहारातील प्रमाण तेवढेच मोठे असले पाहिजे.

शरीराला आवश्यक असलेल्या सर्व पौष्टिक घटकांचा पुरवठा मोड आलेल्या धान्यांमुळे केला जातो. मोड आलेल्या धान्यांचे पोषणमूल्य सर्वाधिक असते. मूग, मटकी, वाल, हरभरा, वाटाणा, अशी कडधान्ये कच्च्या स्वरूपात खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात. ही कडधान्ये शिजवूनही खाता येऊ शकतात. मात्र, कच्च्या स्वरूपात खाल्ल्यास त्याचे जेवढे फायदे होतात, तेवढे फायदे ही धान्ये शिजवून खाल्ल्याने होत नाहीत.

बहुगुणी कडधान्ये

कडधान्यांमध्ये फॉलेट आणि पोटॅशियम यांचे प्रमाण मोठे असते. मोड आलेले काळे हरभरे हे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्‍त समजले जातात. यामध्ये व्हिटॅमिन ‘बी-6’ चे प्रमाण भरपूर असते. त्याचबरोबर प्रोटिनचे प्रमाणही अधिक असते. मोड आलेल्या काबुली चण्यांमध्ये कार्बोहायड्रेटस्, फायबर, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचे प्रमाण मोठे असते. या काबुली चण्यांमुळे पचनशक्‍ती सुधारते. मोड आलेल्या मेथींच्या दाण्यांमुळे मधुमेह आणि सांधेदुखीसारख्या व्याधींवर प्रभावी उपचार होतो, असे संशोधनात दिसले आहे.

याखेरीज आपण ताजी तृणधान्ये स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. मोड आलेले पदार्थ हळूहळू आणि भरपूर चाऊन खा. या पदार्थांचे सेवन भरपूर प्रमाणात करू नका. मोड आलेल्या धान्याला परिपूर्ण आहार बनवण्याकरिता ही धान्ये दूध, दही अशा पदार्थांबरोबर मिसळू खा. मोड आलेल्या धान्यांमध्ये अ‍ॅमिनो अ‍ॅसिडची कमतरता असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे अ‍ॅमिनो अ‍ॅसिडची कमतरता भरून काढली जाते.

मोड आलेली धान्ये कशी सेवन करावीत ?

मोड आलेल्या धान्यावर थोडे तेल टाकून स्टर फ्राय करावेत आणि त्यावर बारीक काकडी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबिर, लिंबू रस टाकून खाल्ल्यास याची चव आणखीनच चांगली होते. या धान्यांना मोड आणून ती शिजवली तर त्यातील पौष्टिक मूल्य आणखी वाढते, असे दिसले आहे. मोड आणून अशा धान्यामध्ये हळद आणि आले टाकून ती शिजवावीत. त्यामुळे या धान्याचे पचन चांगले होते. तसेच संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता कमी होते. सँडविच, पराठे, सामोसे, कचोरी यामध्ये मोड आलेली धान्ये स्टफिंग म्हणून वापरता येतात. रव्याची धिरडी आणि पुलाव यामध्येही या धान्यांचा वापर करता येतो. जर आपल्याला बद्धकोष्टता, अ‍ॅनिमिया, स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्‍तदाब यासारख्या व्याधी असतील तर आपण मोड आलेली धान्ये शिजवून अथवा वाफेवर शिजवून खावीत. मोड आलेल्या धान्यांमध्ये अँटिऑक्सिडंटस्चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्‍ती वाढते. त्याचबरोबर चेहर्‍यावर सुरकुत्या येणे यासारख्या तक्रारीही दूर होतात. मोड आलेल्या धान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना या धान्यांचा भरपूर उपयोग होतो. मधुमेहांच्या रुग्णांनी ही धान्ये खाल्ल्यास त्यांना ऊर्जा मिळते. तसेच त्यांना भूकेवर नियंत्रण ठेवणेही सोपे जाते. मोड आलेल्या धान्यांमुळे हाडांची घनता वाढते, हाडे ठिसूळ होत नाहीत.

खालील धान्यांना मोड आणता येऊ शकता

वजन कमी करण्याकरिता मोड आलेल्या धान्यांचा उपयोग होऊ शकतो. ही धान्ये खाल्ल्यानंतर बराच वेळ आपले पोट भरल्यासारखे राहते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते. मोड आलेल्या धान्यांमध्ये क्लोरोफिनचे प्रमाण भरपूर असते. तसेच ज्यांना अ‍ॅसिडिचीचा त्रास होतो, अशांना या पदार्थांचा उपयोग होऊ शकतो. मोड आलेल्या धान्यांमधील फायटो केमिकल्समुळे आपण अनेक आजार आणि व्याधींशी लढू शकतो. मोड आलेली धान्ये प्राणवायूचा मोठा स्रोत मानली जातात.

खालील धान्यांना मोड आणता येऊ शकतात

गहू, मका, बाजरी, नाचणी, मेथी दाणे, भोपळा, खरबुजा व टरबुजाच्या बिया, मूग, चणे, मसूर, सुके मटार, मोड आलेल्या मुगामुळे शरीरातील कॅलरिजचे प्रमाण 15 टक्के कमी होते. कार्बोहायड्रेटस्ही तेवढ्याच प्रमाणात कमी होतात. प्रोटिन, कॅल्शियम, पोटॅशियम, आर्यन, सोडियम, फॉस्फर यांचे प्रमाण 30 ते 80 टक्के या प्रमाणात वाढते. मोड आलेल्या मुगामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, बी2, बी 3, व्हिटॅमिन सी, के यांचे प्रमाणही वाढते.

हे ही वाचलं का?

Back to top button